For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅफ महिला फुटबॉल : भारत-भूतान उपांत्य लढत आज

06:19 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सॅफ महिला फुटबॉल   भारत भूतान उपांत्य लढत आज
Advertisement

वृत्तसंस्था, मडगाव

Advertisement

पाचवेळच्या विजेत्या भारताला बुधवारी येथे होणाऱ्या सॅफ महिला चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भूतानविरुद्ध प्रबळ दावेदार मानले जाईल. गट फेरीतील प्रभावी कामगिरीनंतर यजमान भारताचे लक्ष विजेतेपदाच्या लढतीत स्थान मिळविण्यावर आहे.

भारतीय संघाने दोन सामन्यांतून सहा गुणांसह गट ब मध्ये अव्वल स्थान पटकाविले. त्यांनी मालदीववर 11-0 असा दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरूवात केली. त्यानंतर गतविजेत्या बांगलादेशविरुद्ध 3-0 असा आत्मविश्वास वाढवणारा विजय नोंदवला. प्रतिस्पर्ध्यांवरील सात वर्षांतील हा त्यांचा पहिला विजय होता.

Advertisement

बांगलादेशविरुद्ध भारताच्या वर्चस्वपूर्ण प्रदर्शनाने विजेतेपदासाठीचा त्यांचा दावा अधोरेखित केला. प्यारी झाक्सा, लिंडा कोम सेर्टो आणि मालविका पी. यांनी गोल नोंदवत या स्पर्धेत बांगलादेशची वर्चस्वपूर्ण पकड संपुष्टात आणली. या विजयामुळे भारताने गटविजेतेपद पटकाविले आणि गट अ मधील उपविजेत्या भूतानसोबत उपांत्य फेरीतील सामना निश्चित केला.

भूतानने मात्र दाखवून दिले आहे की ते सहज पराभूत होणारे नाहीत. ड्रॅगन गर्ल्सने आपल्या पहिल्या सामन्यात गटविजेत्या नेपाळला शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. पण अखेरीस त्यांना 0-1 ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी अ गटातून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी पुरेशी कामगिरी केली. त्यांची शिस्तबद्ध बचावात्मक रचना आणि बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध स्पर्धा करण्याची क्षमता त्यांना यजमानांसाठी एक अवघड प्रतिस्पर्धी बनवू शकते.

भारताची आक्रमक फळी

भारत आपल्या आक्रमक फळीवर अवलंबून राहील. जिने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 14 गोल केले आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षक क्रिस्पिन छेत्री हे संघाच्या भक्कम बचावात्मक कामगिरीवरही खूश असतील. ज्यामुळे त्यांच्या संघाने गट टप्प्यात सलग दोन सामन्यांमध्ये एकही गोल होवू दिला नाही.

भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर छेत्री यांनी आपल्या संघाच्या गोल करण्याच्या दरावर समाधान व्यक्त केले. परंतु संपूर्ण 90 मिनिटे वर्चस्व राखण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी यावर जोर दिला की, संघाला संपूर्ण 90 मिनिटे सातत्याने उच्च शारीरिक आणि सामरिक ताकद टिकवून ठेवण्याची गरज आहे.

नॉकआऊट फेरीच्या सामन्यांमध्ये प्रवेश करताना छेत्रीने शांत भूमिका घेतली आणि सांगितले की, मुलींवर दबाव टाकण्यावर त्यांचा विश्वास नाही. जेणेकरुन त्या मुक्तपणे खेळू शकतील. यजमान संघ प्रत्येक सामन्यागणिक अधिकच सरस दिसत आहे आणि नॉकआऊट फेरीत त्यांच्या अनुभवी खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल. दिवसाच्या सुरूवातीलाच या स्पर्धेतील पारंपरिक दिग्गज मानले जाणारे नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात पहिली उपांत्य फेरी पार पडत असताना, भारत मात्र कोणतीही चूक टाळून, 2019 मध्ये अखेरचा जिंकलेला किताब पुन्हा मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्यास उत्सुक असेल.

Advertisement
Tags :

.