For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशिया भारताच्या पाठिशी

06:12 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
रशिया भारताच्या पाठिशी
Advertisement

पुतीन यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानची धावाधाव : शाहबाज यांचे दूत रशियात

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चीन आणि तुर्किये वगळता पूर्ण जगाकडून भारताला समर्थन मिळत आहे. याचदरम्यान रशियाच्या एका घोषणेमुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या रशियातील राजदूताने सोमवारी रशियाचे उपविदेशमंत्री एंद्रे रुदेंको यांची भेट घेतली. भारतासोबत मिळून जागतिक दहशतवादाच्या धोक्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याची घोषणा रशियाने केली आहे. भारतीय राजदूत विनय कुमार यांनी रशियन उपविदेशमंत्र्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या स्थितीची कल्पना दिली. तर रशियाच्या घोषणेनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले असून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वत:च्या दूताला रशियन विदेश उपमंत्र्यांची भेट घेण्यास सांगितले आहे.

Advertisement

पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमालींच्या विनंतीनुसार रशियाच्या उपविदेशमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान रशिया आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंसोबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यावर चर्चा झाल्याचे रशियाकडून जारी वक्तव्यात म्हटले गेले आहे. रशियाच्या उपविदेशमंत्र्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्यास सांगितले आहे.

दक्षिण आशियातील नव्या स्थितीवर चर्चा झाली. यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान वेगाने बिघडत चाललेल्या संबंधांवरही चर्चा झाल्याचे रशियाच्या उपविदेशमंत्र्यांनी भारतीय राजदूताच्या भेटीनंतर म्हटले होते. तर रशिया संयुक्त स्वरुपात दहशतवादाच्या खात्म्यासाठी तयार असल्याची पुष्टी भारताने दिली आहे.

तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावादरम्यान रशिया आणि चीनच्या मुत्सद्द्यांची बैठक झाल्याचे समोर आले आहे. रशियाच्या विदेश मंत्रालयाने पहलगाम हल्ल्याचा थेट उल्लेख केला नसला तरीही बैठकत दक्षिण आशियातील स्थितीवर चर्चा झाल्याचे संकेत दिले आहेत.

भारत आणि पाकिस्तानातील नवा संघर्ष शांघाय सहकार्य संघटनेसाठी आव्हान निर्माण करत आहे. शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्षत्व सध्या चीनकडे असताना ही स्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव क्षेत्रीय सहकार्य प्रकल्पांसाठी धोका निर्माण करत असून रशियासमोर अवघड स्थिती निर्माण झाली आहे, कारण भारत रशियाकडून मजबूत समर्थन इच्छितो असा दावा तेथील तज्ञांनी केला आहे.

पाकिस्तान संरक्षण मंत्र्यांच्या ‘एक्स’ अकौंटवर बंदी, अनेक पत्रकारांच्या सोशल मीडिया पेजवरही कारवाई

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक खोट्या बातम्या फैलावल्या जात आहेत. भारतीय सैन्य आणि सरकारच्या विरोधात दुष्प्रचाराचा प्रयत्न होत आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानचे पत्रकार आणि पीआर विंग्सचा दुष्प्रचार पाहता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच भारतात पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले होते. आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकौंटही ब्लॉक करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारने अनेक पाकिस्तानी पत्रकारांच्या सोशल मीडिया अकौंट्सवर बंदी घातली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या काही तासांनंतर वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलद्वारे फेक नॅरेटिव्ह निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट होऊ लागले होते. हा दुष्प्रचार पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सकडून (आयएसपीआर) होत असतो. आयएसपीआर पाकिस्तानी आर्म्ड फोर्सेसची मीडिया आणि पब्लिक रिलेशन्स विंग आहे. ही यंत्रणा आयएसआयच्या अंतर्गत काम करते.

पहलगाम हल्ल्यानंतर ज्याप्रकारे फेक व्हिडिओ आणि फेक मेसेज पाठविण्यात आले, ते पाहता भारतीय सैन्याची टीम देखील पूर्णपणे सतर्क आहे. सातत्याने अशा फेक आणि खोटी माहिती देणाऱ्या व्हिडिओंची ओळख पटविली जात आहे. याचदरम्यान सरकारने कारवाई सुरू करत पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत अनेक पाकिस्तानी पत्रकारांची सोशल मीडिया अकौंट्सवर बंदी घातली आहे.

युट्यूब चॅनेल्सवरही कारवाई

यापूर्वी केंद्र सरकारने अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर देखील कारवाई केली होती. अनेक युट्यूबर्सच्या अकौंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करत कमाई करणाऱ्या अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सना भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. सना अमजद, आरजू काजमी आणि शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेललाही ब्लॉक करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.