दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया, जपान भारतासोबत
पुतिन यांचा पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क : जपानच्या संरक्षणमंत्र्यांशी राजनाथ सिंह यांची चर्चा
वृत्तसंस्था/ मॉस्को, नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात पाकिस्तानविरुद्ध संताप सुरू असतानाच विदेशातून भारताला मोठे पाठबळ मिळत आहे. रशिया आणि जपान या दोन मोठ्या देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून भारतातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्युबद्दल तीव्र शोक व्यक्त करतानाच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना अद्दल घडविली पाहिजे असे पुतिन म्हणाले. तसेच रशिया आणि भारत यांच्यातील संबंध बाह्य प्रभावामुळे प्रभावित न होता ते विकसित होत राहतील यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोमवारी पुतिन आणि मोदी यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा केली आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा केली. तसेच दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी राष्ट्रपती पुतिन यांना विजय दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेला आमंत्रित केल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. रॉयटर्सनेही क्रेमलिनचा हवाला देत यासंबंधी माहिती जारी केली आहे.
रशियाचा भारताला पाठिंबा : जयस्वाल
रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पुतिन यांनी या भयानक हल्ल्यातील दोषी आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई व्हावी, यावर भर दिला. दोन्ही नेत्यांनी विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.’ 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 लोक ठार झाले होते. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली असली तरी अद्याप दहशतवादी पकडले गेले नाहीत.
पहलगाम प्रकरणात जपानही भारतासोबत
भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जपानी संरक्षणमंत्री नाकातानी यांच्यात एक प्रमुख बैठकही झाली. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरही चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ला, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींबाबत सोमवारी भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये बैठक झाली. दोन्ही बाजूंनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थिती आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावर चर्चा केली. गेल्या सहा महिन्यांत दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची ही दुसरी बैठक आहे.