रश्त-अस्तारा रेल्वेमार्गासाठी रशिया-इराणमध्ये करार
भारतालाही होणार लाभ : मुंबई आणि सेंट पीटर्सबर्गमधील अंतर कमी होणार : आयएनएसटीसी प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया आणि इराण या देशांदरम्यान रश्त-अस्तारा रेल्वेमार्ग निर्मितीसाठीची बोलणी जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. हा करार मार्च अखेरपर्यंत होईल, अशी माहिती सोमवारी देण्यात आली. ‘आयएनएसटीसी’ म्हणजे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे अध्यक्ष एम. पेझेश्कियान यांनी 17 जानेवारी रोजी क्रेमलिनमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान बांधकाम सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीनंतर भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची प्रक्रिया सुकर होणार आहे.
162 किमी लांबीचा रश्त-अस्तारा रेल्वेमार्ग बांधण्याच्या उद्देशाने रशिया आणि इराणने 2023 मध्ये एक करार केला. आयएनएसटीसीचा पश्चिम मार्ग पूर्ण करण्यासाठी हा एक महत्त्वाचा दुवा आहे. या प्रकल्पासाठी रशिया इराणला 1.3 अब्ज रुपये देईल. संपूर्ण प्रकल्पाची किंमत 1.6 अब्ज रुपये आहे. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
आयएनएसटीसी हा मुंबई आणि सेंट पीटर्सबर्गला जोडणारा सर्वात लहान व्यापारी मार्ग आहे. यासाठी सध्या तीन मुख्य मार्ग आहेत. पहिला ट्रान्स-कॅस्पियन मार्ग रशियातील अस्त्रखान, ओल्या आणि मखाचकला बंदरांमधून आणि इराणमधील बंदर अंझाली, अमिराबाद आणि नौशहर बंदरांमधून जातो. दुसरा पूर्वेकडील मार्ग कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराणमधून जाणाऱ्या विद्यमान रेल्वेमार्गावर आहे. पूर्व रशियातील काही वस्तू या मार्गाने भारतात येतात. तिसरा पश्चिम मार्ग आस्त्रखानपासून समूर मार्गे अझरबैजानमधील अस्तारा स्टेशनपर्यंत आणि नंतर इराणमधून बांधकामाधीन अस्तारा-रश्त-काझविन मार्गाने जातो.
मुंबई-सेंट पीटर्सबर्गमधील अंतर कमी होणार
अझरबैजान त्यांच्या हद्दीतून जाणारा हा मार्ग कार्यान्वित करण्यावर काम करत आहे. मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यानचा हा सर्वात लहान मार्ग आहे. भारत-रशिया व्यापारासाठी इराणमधून जाणाऱ्या तीन आयएनएसटीसी मार्गांपैकी अझरबैजान मार्ग हा मूळ मार्ग आहे. परंतु अझरबैजानने त्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यास विलंब केला आहे. उझबेकिस्तान आयएनएसटीसी आणि चाबहार बंदराच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यास उत्सुक आहे.
प्रकल्प गेमचेंजर ठरणार
रश्त-अस्तारा रेल्वेमार्ग निर्मितीमुळे भारत आणि रशिया या देशामधील वस्तू आयात-निर्यात वेगवान गतीने होणार आहे. याचा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना फायदा होईल. हा आयएनएसटीसी प्रकल्प एक गेमचेंजर ठरू शकतो. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे या प्रदेशात व्यापार आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. हे एक ऐतिहासिक पाऊल असून ते भारत आणि रशियामधील संबंध अधिक मजबूत करेल, असा दावा केला जात आहे.