रशियाकडून पुन्हा व्यापारी जहाजावर हल्ला
दोन भारतीय खलाशी बेपत्ता : एका आठवड्यात दुसरी घटना
वृत्तसंस्था, कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवरील हल्ले वाढत चालले आहे. युक्रेनचे प्रमुख बंदर शहर ओडेसामध्ये शनिवारी आणखी एक व्यापारी जहाज ‘एमव्ही एजीएन रगनार’ हल्ल्याचे शिकार ठरले आहे. या जहाजावर 4 भारतीय नागरिक कार्यरत होते. चारपैकी 2 भारतीय नागरिक पूर्णपणे सुरक्षित आहेत, तर दोन बेपत्ता भारतीयांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत असल्याचे कीव्ह येथील भारतीय दूतावासाकडून रविवारी सांगण्यात आले.
25 जुलै रोजी ओडेसा बंदरावर व्यापारी जहाज एमव्ही एजीएन रागनरवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय दूतावास स्थितीवर सातत्याने नजर ठेवून आहे. जहाजावरील हल्ल्यानंतर 2 भारतीय बेपत्रा झाले आहेत. त्यांच्या शोधासंबंधी दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. दूतावासाने आपत्कालीन स्थितीसाठी संपर्क क्रमांकही जारी केला आहे.
ओडेसा बंदरावरील हल्ल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे, कारण यापूर्वी 19 जुलै रोजी ओडेसा बंदरावरून रवाना झालेले मालवाहू जहाज एमव्ही गोल्डन लियोवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला होता, या हल्ल्यात 4 भारतीय खलाशांना जीव गमवावा लागला होता, त्या घटनेनंतर भारत सरकारने कठोर शब्दांत संताप व्यक्त करत रशियाच्या राजदूताला पाचारण केले होते.
विदेश मंत्रालयाकडून दिशानिर्देश
काळ्या समुद्रात जहाजांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यत कमीतकमी 5 भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. स्थितीचे गांभीर्य पाहता भारताच्या विदेश मंत्रालयाने या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय खलाशी आणि मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्यांसाठी एक विस्तृत सुरक्षा दिशानिर्देश जारी केले आहेत. एप्रिल महिन्यापासून काळ्या समुद्रात मालवाहू जहाजांवर क्षेपणास्त्रs अन् ड्रोन हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा जोखिमयुक्त सागरी मार्गांमधून जाणाऱ्या जहाजांना सतर्क राहण्याची गरज आहे. कुठलीही शिपिंग कंपनी किंवा रिव्रूटमेंट एजेन्सीसोबत काम सुरू करण्यापूर्वी जहाजाचा मार्ग, थांबा असलेली बंदरं, विमा सुरक्षा, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसादाची पूर्ण माहिती प्राप्त करण्याचे आवाहन विदेश मंत्रालयाने केले आहे.