शासकीय कागदपत्रांसाठी तहसीलदार कार्यालयात वर्दळ
जात-उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्रांची मागणी
बेळगाव : शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने शासकीय कागदपत्रांची मागणी वाढू लागली आहे. यासाठी जुन्या तहसीलदार कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. विशेषत: जात-उत्पन्नाचा दाखला, यासह इतर कागदपत्रांची मागणी वाढत आहे. त्याबरोबर याठिकाणी सात-बारा उतारा आणि इतर शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्यामुळे कार्यालय गजबजू लागले आहे. खरीप हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बि-बियाणे, खते, कीटकनाशक आणि साधनसामुग्री खरेदीसाठी सात-बारा उतारा महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. शासकीय कागदपत्रांसाठी जनस्नेही केंद्र आणि बेळगाव वन कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. शहरात बेळगाव वन कार्यालये आहेत. तर ग्रामीण भागात ग्राम वन कार्यालयातून ही कामे केली जात आहेत. शाळांना प्रारंभ झाल्याने प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि इतर सुविधांसाठी जात-उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जात-उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे जनस्नेही केंद्र, बापूजी सेवा केंद्र, बेळगाव वन आणि ग्राम वन कार्यालयात नागरिकांची ये-जा वाढताना दिसत आहे. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना जात-उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रे गरजेची आहे. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे.