यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलिसांची बिजगर्णी गावाला भेट
वार्ताहर /किणये
बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावांची महालक्ष्मी यात्रा मंगळवारपासून सुरू होणार आहे. या यात्रेसंदर्भात व यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वडगाव ग्रामीणच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बिजगर्णी गावाला भेट दिली व यात्रा शांततेत पार पडण्याचे आवाहन केले. पोलिसांनी प्रथमत: ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर यात्रा परिसराची व गावची पाहणी करून यात्रा कमिटीला काही विशेष सूचना केल्या. यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व काही प्रशासनाच्या नियमानुसार सूचना त्यांनी यात्रा कमिटीला केल्या. पोलीस खात्यामार्फत यात्रेसाठी संरक्षण दिले जाईल. त्याचबरोबर कमिटीने विशेष खासगी सिक्मयुरिटी गार्ड्सचीही नेमणूक करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सीपीआय नचिकेत जनगौडा, हवालदार एम. बी. कोटबागी, पोलीस कॉन्स्टेबल सन्नाप्पा हांचिनमनी, उदय पुजारी हे उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, पीडिओ रविकांत निंगाप्पा जाधव, श्रीरंग भास्कर आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.