भांडुरा प्रकल्पाविरोधात रुमेवाडी शेतकऱ्यांची तक्रार
भूमी अधिग्रहणसाठी नोटिसा बजावल्याने 50 शेतकऱ्यांनी उठविला आवाज : नोटिसा महिनाभर उशीराने : न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय
खानापूर : तालुक्यातील भांडुरा नाला वळवून मलप्रभा नदीत सोडण्यासाठी तालुक्यातील रुमेवाडी, असोगा, करंबळ येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यासाठी शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहणाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या विरोधात बागलकोट येथील मलप्रभा प्रकल्प 3 भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली आहे. यावेळी रुमेवाडी येथील दामोदर अवलक्की, बाळकृष्ण घाडी, नागेंद्र बेडरे, देवाप्पा पानेरी, अमोल बेडरे, निळकंठ बेडरे, जोतिबा चौगुले, परशराम घाडी, मोनेश्री बेडरे, सहदेव चौगुले यासह जवळपास 50 शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहण विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
नेरसा ते नवलतिर्थपर्यंत संपूर्ण भूमिगत पाईपलाईन घालण्यात येणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. जी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्या जमिनीवर नेरसा येथील भांडुरा नाला ते नविलतिर्थ डॅमपर्यंत पाईपलाईन घालण्यात येणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी बागलकोट येथील मलप्रभा प्रकल्प 3 हे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक या नोटिसा एक महिनाभर उशीरा शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या.
या नोटिसीत प्रकल्पाला विरोध करण्यास 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र जवळपास 35 ते 40 दिवस उशीरा नोटिसा शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या. गेल्या काही दिवसापूर्वी पर्यावरणवाद्यांच्या बैठकीनंतर भांडुरा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी निश्चय करण्यात आल्यानंतर शेतकरी नोटिसीला उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दि. 5 रोजी रुमेवाडी येथील शेतकऱ्यांनी बागलकोट येथे जावून मलप्रभा प्रकल्प 3 भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी नोंदविल्या आहेत. शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहण करण्यास विरोध करण्याचा निर्णय घेतला असून रस्त्यावरील तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.