खड्ड्यांमुळे खानापूर शहरातील रस्त्यांची चाळण
नगरपंचायतीचे दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष : खड्डे चुकवताना वाहनधारकांसह नागरिकांचे हाल
खानापूर : शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपंचायतीने पावसाळ्dयापूर्वी या खड्ड्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते. नगरपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने खड्डे मोठे झाल्याने डबक्याचे स्वरुप निर्माण झाले असून शहरातील मुख्य रस्ताच खड्ड्यांनी व्यापल्याने नागरिकांना या रस्त्यावरुन चालत तसेच दुचाकीवरुन जाताना कसरत करावी लागत आहे.राजा छत्रपती स्मारक ते महाजन खुट्टपर्यंत मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. शहराच्या प्रवेशद्वारापासूनच खड्ड्याला सुरुवात झाली आहे. राजा छत्रपती स्मारक ते महाजन खुट्टपर्यंत पावसामुळे हे खड्डे मोठे झाले आहेत.
त्यामुळे त्यात पाणी साठून असल्याने डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने नागरिकांना खड्डे चुकवून जाताना कसरत करावी लागत आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांचीच खड्ड्यांमुळे चाळण झाली असतानादेखील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी आणि प्रशासकानी तसेच नगरसेवकांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी निदान या खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे साफ दुर्लक्ष केल्याने पावसामुळे हे खड्डे मोठे झाले आहेत. लक्ष्मीनगर जुना मोटर स्टँड बाजारपेठ यासह इतर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मात्र नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून रहदारी करणे धोक्याचे झाले आहे. नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची नेमणूक केली आहे. तसेच मुख्याधिकारी म्हणून संतोष कुरबेट काम पहात आहेत.
निदान तात्पुरत्या डागडुजीची गरज
नुकतीच नगरसेवकांची बैठक घेण्यात आली होती. यात नगरोत्थानच्या निधीतून शहराच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याचे ठरविले होते. मात्र मागणी करूनदेखील या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याबाबत नगरसेवकांनी प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे नगरसेवकांच्या या भूमिकेबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरोत्थानच्या निधीतून रस्त्यांचे भाग्य उजळेल तेंव्हा उजळेल. मात्र सध्या तात्पुरती का होईना डागडुजी करणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी विटांचे तुकडे तसेच इतर साहित्य टाकून रस्ते बुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र नगरसेवकांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.