तुळस घाटीत ब्रेक फेल झाल्याने रिक्षाला अपघात
वायंगणी येथील महिला गंभीर : पाच महिन्यांचे बालक बचावले : रिक्षा चालकासह अन्य एका महिलेवर उपचार सुरू
प्रतिनिधी
वेंगुर्ले
मळगाव येथून वेंगुर्ला येथे येणाऱ्या रिक्षेचा तुळस घाटीतील उतारावर ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात वायंगणी येथील आराध्या आदेश साळगावकर (३०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना तातडीने गोवा बांबोळी येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातात त्यांचा कमलाकांत आदेश साळगावकर हा पाच वर्षाचा बालक मात्र बालबाल बचावला. अपघातात जखमी झालेले रिक्षाचालक व अन्य महिला या दोघांवर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दाभोली येथील रिक्षा चालक रुपेश सखाराम माडकर (४४) हे एमएच ०७ एएच २७५० या रिक्षेने मळगाव ते वायंगणी असे प्रवासी भाडे घेऊन निघाले होते. या रिक्षेत वायंगणी येथील सौ. आराध्या आदेश साळगावकर, त्यांचा पाच महिन्याचा मुलगा कमलाकांत आदेश साळगावकर, कोलगाव येथील त्यांच्या भगिनी सौ. ऋतुजा राजा कुडाळकर (२८) व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा रोहन राजा कुडाळकर अशी माणसे प्रवास करत होती. तुळस घाटीतील मोठ्या उतारावर येताच रिक्षेचे ब्रेक फेल झाल्याने रिक्षा पलटी झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात आराध्या साळगावकर, ऋतुजा कुडाळकर व रिक्षाचालक रुपेश माडकर यांच्या डोक्याला दुखापत झाली. खासगी वाहनाने जखमींना वेंगुर्लातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण कुंटे व डॉ. सत्यम आगलावे यांनी तातडीने जखमींवर उपचार केले. आराध्या या गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोवा येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी घटनेची माहिती वेंगुर्ला पोलिसांना दिली. त्यानंतर वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले, हेडकॉन्स्टेबल रूपा वेंगुर्लेकर, रंजिता चव्हाण, बंटी पालकर व महिला पोलीस कुंभे यांनी उपजिल्हा रुग्णालयात येत जखमींची भेट घेत अपघाताबाबत माहिती घेतली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.