‘इंडिया’ आघाडीसमवेत चर्चा करण्यास ‘आरजी’ तयार
तीन अटी मान्य केल्यास जागा वाटपाबाबत बोलणी : आरजीच्या नव्या भूमिकेमुळे तर्कवितर्क सुरू
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दक्षिण व उत्तर गोवा मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या पक्षाने ‘इंडिया’ आघाडीसमवेत चर्चा करण्यास तयार असल्याचे काल सोमवारी सांगितल्याने एकच खळबळ माजली. आपल्या तीन अटी मान्य झाल्यानंतरच जागा वाटपाबाबत पुढील बोलणी करू, अशी भूमिका पक्षाचे प्रमुख तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मनोज परब यांनी घेतली आहे. आरजीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मनोज परब बोलत होते. यावेळी आमदार विरेश बोरकर उपस्थित होते. परब यांनी सांगितले की, तीन अटींपैकी पहिली म्हणजे म्हादई केवळ गोव्यासाठीच आहे हे जाहीर करणे, कोमुनिदाद जागेतील झोपडपट्ट्या पाडणे, आणि पोगो विधेयक स्विकारणे या तीन अटी मान्य केल्यास आरजी पक्ष इंडी आघाडीसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करण्यास तयार आहे. या अटी मान्य करण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदत देत असल्याचेही त्यांनी सांगितले.