मंदबुद्धी
अध्याय दुसरा
सद्गुरुंनी काही सांगितलं की, शिष्याने ते तंतोतंत अंमलात आणणे हे खरे म्हणजे त्याच्या भल्याचे असते आणि तसं न करता जो सद्गुरूंच्या उपदेशाला फाटे फोडतो त्याचं होणारं नुकसान सद्गुरू देखील थांबवू शकत नाहीत. आपल्या शरीराला काहीही तोशीश न लागता एखाद्या गोष्टीतून आपला स्वार्थ साधला जावा अशी माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. इथं बाप्पांनी तर सांगितलं की, कर्म कर आणि त्याचे फल ईश्वराला अर्पण कर म्हणजे तू कर्मबंधनातून मुक्त होशील आणि तुझं जन्ममृत्यूचं चक्र संपुष्टात येईल. हे ऐकल्यावर काही माणसे असा विचार करतात की, एव्हीतेव्ही कर्म करून मिळणारं फळ घ्यायचंच नाहीये तर मुळातच कर्म करा कशाला? त्यापेक्षा काहीच न करता स्वस्थ बसावं आणि आराम करावा हे बरं! अर्थातच अशा पद्धतीने मनुष्य करत असलेला विचार त्याच्या नाशास कारणीभूत होतो. माणसाचा हा विपरीत विचार लक्षात घेऊन पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत.
अनारम्भेण वैधानां निक्रिय पुरुषो भवेत् ।
न सिद्धिं याति संत्यागात्केवलात्कर्मणो नृप ।। 3।।
अर्थ-कर्म न करण्याने मनुष्य निक्रिय होतो. हे राजा, केवळ कर्माच्या त्यागातून सिद्धि प्राप्त होत नाही.
विवरण-बाप्पा म्हणतात, मनुष्य जन्म हा कर्म करण्यासाठी आहे. तसेच कोणते कर्म करायचे ह्याची त्याला मुभाही आहे. तसेच माणसाची इच्छा असो नसो त्याच्या हातून कर्म तर होणारच म्हणून प्रारब्ध तयार होऊ नये यासाठी मी कर्माला सुरवातच करणार नाही हा नकारार्थी विचार म्हणजे कर्तव्यकर्म टाळून, त्यापासून पळ काढण्याचा प्रकार झाला. असं करून काहीच साधत नसतं. उलट दोनप्रकारे नुकसान होतं. कसं ते पुढील श्लोकात बाप्पा सांगत आहेत.
कदाचिदक्रिय को पि क्षणं नैवावतिष्ठते ।
अस्वतत्र प्रकृतिजैर्गुणै कर्म च कार्यते ।। 4 ।।
अर्थ- केंव्हाही, क्षणभर देखील कोणीही कर्महीन रहात नाही. मनुष्य अस्वतंत्र असतो. स्वभावातील अथवा नैसर्गिक गुणांकडून कर्म करविले जाते.
विवरण- कर्म टाळणे म्हणजे आपल्या इच्छेनुरूप शारीरिक क्रिया टाळणे पण एव्हढ्याने संपूर्ण कर्म टळत नाही कारण जीवनावश्यक क्रिया त्याची इच्छा असो वा नसो घडतच असतात. उदाहरणार्थ श्वास घेणे, पापणी लववणे, अन्न पचन होणे ह्या शारीरिक क्रिया कायम चालूच असतात. तेव्हा मी कर्मच करणार नाही असं जरी म्हंटलं तरी ते संपूर्णतया शक्य नाही. मनुष्याला कर्म टाळायचं स्वातंत्र्य ईश्वराने दिलेलं नाही. त्यानं तसा प्रयत्न जर केला, तरी त्याचा स्वभाव त्रिगुणात्मक असल्याने सत्व, रज, तम यापैकी ज्या गुणाचा जोर त्याच्या स्वभावात असेल त्याला अनुरूप कर्म त्याच्या हातून घडतंच घडतं. कर्म करणे हे नैसर्गिक असल्याने त्याला ते टाळणं शक्य नसतं.दुसरी गोष्ट अशी की, कर्तव्यकर्म टाळून जो पळ काढेल त्याला हेच बरोबर आहे असे वाटत राहील. आणि आळसात जीवन जगण्याने तामसी वृत्तीत वाढ होईल. मी म्हणतो तेच खरं असं वाटू लागेल. निरनिराळे दुर्गुण येऊन चिकटतील आणि वाढीस लागतील. त्यामुळे अध:पतन होऊन पुढील जन्म मनुष्यापेक्षा खालच्या योनीतला मिळेल. म्हणून कर्म टाळून काहीच साधणार नाही मुक्ती तर दूरच!
कोणतंही कर्म करताना त्यात इंद्रियांचा मोठा वाटा असतो म्हणून वाईट कर्म करण्यापासून त्यांना रोखून धरून काहीच साध्य होत नाही. कारण त्यांना बळेच रोखून धरलं तरी मनात विषयांचं चिंतन चालूच असतं. म्हणून अयोग्य वाटणारं कर्म टाळून स्वस्थ बसण्याने काहीच साध्य होत नाही.
कर्मकारीन्द्रियग्रामं नियम्यास्ते स्मरन्पुमान् ।
तद्गोचरान्मन्दचित्तो धिगाचार स भाष्यते ।। 5 ।।
अर्थ-कर्म करणारा मनुष्य इंद्रियसमुदायाचे नियमन करतो पण विषयाचे स्मरण करीत राहतो, तो मंदबुद्धि होय. याला खोटा अथवा निंदास्पद आचार म्हणतात.
क्रमश: