पोटनिवडणुकीच्या निकालामुळे राजकारणाची दिशा बदलेल!
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे भाकित
बेंगळूर : दावणगेरे आणि बागलकोट येथील पोटनिवडणुकांच्या निकालामुळे संपूर्ण राज्यातील राजकारणाची दिशा बदलेल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केले. दावणगेरेच्या के. बी. वसाहतीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, या दोन पोटनिवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षासाठी ताकद बनतील, असे राज्यातील जनता असे म्हणत आहे. याचबरोबर दोन्ही मतदारसंघांमध्ये विकासही होईल, असे त्यांनी सांगितले.
दावणगेरे दक्षिणच्या जनतेला मतदारसंघात बदल हवा आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार श्रीनिवास दास करियप्पा यांचा ऐतिहासिक विजय होईल. दावणगेरे दक्षिण आणि बागलकोट येथील पोटनिवडणुका संपूर्ण राज्यातील जनतेला एक नवीन संदेश देतील. आतापर्यंत राज्यात काँग्रेस पक्ष अल्पसंख्याकांचा केवळ मतदार म्हणून वापर करत होता. आता अल्पसंख्याकांना हे समजले आहे. त्यामुळे यावेळी दोन्ही मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याकांसह सर्व स्तरांतील लोक भाजपच्या उमेदवारांनाच निवडतील, असेही बी. वाय. विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.
भाजप उमेदवाराचा विजय निश्चित
दावणगेरे दक्षिण पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि बसवराज बोम्माई यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते भाजपचे उमेदवार श्रीनिवास दास करियप्पा यांच्यातर्फे प्रचार करणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना उत्साह आणि बळ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर दावणगेरे दक्षिणमध्ये भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.