उचगाव मळेकरणी यात्रेवर निर्बंध कायम
ग्रामस्थांच्या समस्येचे फलक तयार करून केले अनावरण : आमराईत सर्वत्र शुकशुकाट
वार्ताहर /उचगाव
उचगाव मळेकरणी देवस्थानमध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतलेल्या ‘पशुहत्या बंदी’च्या निर्णयाचे सर्वंच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. यात्राकाळात उचगाव ग्रामस्थांना कोणकोणत्या समस्यांना कसे तोंड द्यावे लागत होते हे, सर्व भाविकांना कळावे, यासाठी यावर तयार केलेल्या विशेष फलकांचे अनावरण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 7 जून रोजी मळेकरणी देवीच्या आमराईकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारामध्ये करण्यात आले आणि सदर परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. उचगाव येथे भरणाऱ्या मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये पशुहत्या करून जेवणावळीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भरत होते. यात्राकाळात आमराईमध्ये भरणारी यात्रा आणि मंगल कार्यालयातून होणारी यात्रा यामुळे या सहा महिन्यात उचगाव बसस्थानकावरती व परिसरामध्ये तोबा गर्दी होत असे. परिणामी होणारी वाहतुकीची कोंडी, येणारे अनेक भाविकांची भक्ती कमी मौजमस्ती अधिक, असे समजून परिसरात दारू ढोसून बाटल्या टकण्याचे व कचरा सर्वत्र अस्ताव्यस्त टाकून उचगावकरांचे जिणे मुश्किल करून सोडले होते.
शेतवडीत अनेक बाटल्यांचा काचा विखुरल्याने शेतात जाण्यास शेतकरी आणि महिला घाबरत होत्या. तसेच केरकचरा जवळपासच्या शेतातून, नाल्यांतून फेकण्यात येत होता. याचा परिणाम शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणात होत होता. याशिवाय उचगावमधील युवावर्ग यात्रेनिमित्त येणाऱ्या मित्रमंडळी, पै पाहुण्यांकडून दारू-मटणामध्ये गुंतल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढत चालले होते. याला कुठेतरी आळा घालणे गरजेचे असल्याने ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने पशुहत्या बंदी आणि यात्रेवर निर्बंध घालण्यासाठीच सर्वजण पुढे सरसावले आणि आता याला यश आले आहे. इथून पुढे पूर्णपणे ही यात्रा बंदच राहणार आहे. यासाठीच शुक्रवारी सकाळी मोठमोठे फलक लावून सर्वांना याची या फलकाद्वारे कल्पना देण्याचे काम केले आहे. शुक्रवारी सकाळी हा फलक अनावरण कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, युवराज कदम, बी. एस होनगेकर, पुंडलिक कदम-पाटील, लक्ष्मण होनगेकर, संभाजी कदम, रामा कदम, एन. ओ. चौगुले, विनोद पावशे, मधुकर जाधव, शरद जाधव, मल्लाप्पा कदम, बंटी पावशे, एल. डी. चौगुले, यादो कांबळे, मनोहर कदम, माऊती खांडेकर, दत्ता बेनके, सुतार यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.