निवडणूक अधिकाऱ्यांच्या रजांवर निर्बंध
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केंद्रस्थान न सोडण्याचा आदेश
बेळगाव : लोकसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा होताच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजकीय पक्षांचे जाहिरात फलक तातडीने हटविण्याचा आदेश जारी केला आहे. तर निवडणूक कामासाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय रजा घेऊ नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. आचारसंहितेचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारी, राजकीय पक्षांच्या जाहिराती, निवडणुकी संदर्भातील जाहिराती फलक तात्काळ हटविण्यात यावेत, भीत्तीपत्रके, भिंतीवर लिहिणे, बॅनर, कटआऊट 24 तासांत काढण्यात यावेत, सरकारी विश्रामगृहांमध्ये राजकीय पक्षांचे कोणतेच कार्यक्रम राबवू नयेत, सदर विश्रामगृहे तहसीलदारांनी आपल्या ताब्यात घ्यावीत, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. तर विकासकामांसंदर्भात अथवा इतर कोणत्याच कामांसाठी निविदा बोलाविण्यात येऊ नये, सरकारी अधिकाऱ्यांची बदली करण्यात येऊ नये, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी बदली आदेश जारी केलेला असल्यास निवडणूक पूर्ण होईपर्यंत बदली आदेश रद्द करण्यात आला आहे. अशी प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावीत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अधिकाऱ्यांनी आवश्यकता नसताना राजकीय व्यक्तींची भेट घेऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे. जिल्हा, तालुका आणि सर्व खात्यातील मुख्य अधिकाऱ्यांच्या रजेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच रजा घ्यावी लागणार आहे. निवडणूक कामांसाठी नियोजित केलेल्या साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी, साहाय्यक आयुक्तांनी, तहसीलदार यांनी निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त केंद्र स्थान सोडू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.