आरोस गावातील समस्या तत्काळ मार्गी लावा
ग्रामस्थांची मागणी ; प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी
न्हावेली /वार्ताहर
आरोस गावातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले. गावातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था, पाणीटंचाई, वीज पुरवठ्याचा लपंडाव आदी प्रश्नांबाबत २५ मे रोजी विभागप्रमुख गुरुनाथ साबाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आरोस ग्रामपंचायतीत धडक देत प्रशासक शंकर नाईक व ग्रामसेवक कुबल यांना जाब विचारला. यावेळी उपसरपंच प्रसाद नाईक, यशवंत सावंत, गणपत नाईक, प्रकाश परब, लक्ष्मण सावंत व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी गावातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. विशेषतः गोव्यात नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या तरुण-तरुणींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्य रस्ता तसेच माऊली मंदिर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.गिरोबावाडी येथील विहीर तात्काळ साफ करून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासनही देण्यात आले. नाबरवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे ग्रामसेवकांनी सांगितल्याची माहिती गुरुनाथ नाईक यांनी दिली.देश विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असताना आरोस गावातील नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल गुरुनाथ नाईक यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.