तृणमूल राज्यसभा सदस्याचा राजीनामा
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ कृती, ममता बॅनर्जींवर टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी असणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी ही कृती केली आहे. त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली असून निराश होऊन राजकारणत्याग करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
डॉक्टर महिला बलात्कार आणि हत्या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद होती. प्रथम हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर ताशेरे ओढत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला. यात मधे जो वेळ गेला, त्यात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
मानसिक त्रास असह्या
गेल्या एक महिनाभर या प्रकरणामुळे राज्यात जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे मी अत्याधिक अस्वस्थतेचा अनुभव घेत आहे. पुष्कळ मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या स्थितीत आपण आपल्या पूर्वीच्या शैलीत काहीतरी कठोर कृती कराल आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल अशी माझी अपेक्षा होती. तथापि, तसे काहीही झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे मी माझे पद सोडण्याचा आणि राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यात आणि राजीनामापत्रात स्पष्ट केले आहे.
भ्रष्टाचार अस्वीकारार्ह
जवाहर सरकार यांनी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणासमवेत राज्य सरकारशी संबंधित अन्य अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे उघड होऊनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. चॅटर्जी यांच्या गैरव्यवहारांची त्वरेने दखल घ्यावी असे जाहीर वक्तव्य मी केले होते. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे सारे प्रकार मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. 2021 मध्ये मी मोठ्या अपेक्षेने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण 2022 पासूनच माझा या पक्षासंबंधी भ्रमनिरास होत आहे. त्यामुळे मी या पक्षाचा खासदार म्हणून काम करण्याच्या परिस्थितीत नाही, असा उघड उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.
नावाजलेले आयएएस अधिकारी
जवाहर सरकार हे नावाजलेले आयएएस अधिकारी होते. प्रामाणिकपणासंबंधी त्यांची ख्याती होती. 41 वर्षे त्यांनी प्रशासकीय विभागांमध्ये काम केले. तथापि, त्यांना इतर अधिकाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात आल्या नाहीत. एक सदनिकाही त्यांना पुरविण्यात आली नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करुन ते कार्यालयात जात असत. 2021 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभा खासदारपद देण्यात आले. आता ते त्यांनी सोडले आहे.