For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे सुटण्यापूर्वी आठ तास तयार होणार आरक्षण चार्ट

06:08 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे सुटण्यापूर्वी आठ तास तयार होणार आरक्षण चार्ट
Advertisement

रेल्वेमंत्र्यांकडून प्रस्तावाला हिरवा कंदील : टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वे तिकीट आणि आरक्षण प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्यासाठी सातत्याने मोठी पावले उचलत आहे. 1 जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलत असतानाच आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. या प्रस्तावानुसार रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्यात येणार आहे.

Advertisement

रेल्वे बोर्डाने प्रवासी ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला सहमती दर्शवत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हा प्रस्ताव टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी भेट मानली जात आहे. विशेष म्हणजे हा निर्णय प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी चांगले अंदाज देऊ शकेल.

रेल्वेच्या या पावलामुळे आता प्रवाशांना त्यांचे रेल्वे तिकीट बुक केल्यानंतर प्रतीक्षा यादीच्या पुष्टीकरणाची माहिती आधीच मिळेल आणि त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. अशा परिस्थितीत ज्या प्रवाशांची तिकिटे कन्फर्म झाली नाहीत त्यांना आता इतर प्रवास पर्याय निवडण्यासाठी अधिक वेळ मिळेल. रेल्वेमंत्र्यांना यासंदर्भात अनेक प्रस्ताव येत होते.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सतत पावले उचलत आहे. नव्या निकषांनुसार 1 जुलै 2025 पासून मोठे बदल होणार आहेत. यापैकी एक म्हणजे रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल होत असून आता फक्त आधार-सत्यापित वापरकर्तेच आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवर तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. त्यानंतर रेल्वे भाड्यात वाढ देखील लागू केली जाईल. 1 जुलै 2025 पासून रेल्वे तिकिटांमध्ये वाढ लागू करणार असून नॉन-एसी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे भाडे प्रतिकिलोमीटर 1 पैसे वाढवले जाईल. तसेच एसी क्लासमध्ये ते प्रतिकिलोमीटर 2 पैसे वाढवले जाईल. 500 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी द्वितीय श्रेणीच्या रेल्वे तिकिटांच्या आणि एमएसटीच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. परंतु जर अंतर 500 किमीपेक्षा जास्त असेल तर प्रवाशाला वाढीव तिकीट दर लागू होतील.

Advertisement

.