एका बैठकीमुळे दूर झाली नाराजी
शशी थरूर यांनी मानले राहुल गांधींचे आभार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले केरळमधील खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत चर्चा केली आहे. या दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर थरूर यांनी पक्षात सर्वकाही सुरळीत असून आम्ही एकत्रितपणे पुढे जात आहोत असे म्हटले आहे. तसेच थरूर यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांचे आभारही मानले आहेत.
तत्पूर्वी थरूर, राहुल गांधी आणि खर्गे यांची भेट संसद भवनातील खर्गे यांच्या कार्यालयात झाली. शशी थरूर यांनी या भेटला सार्थक आणि सकारात्मक ठरविले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी या भेटीचे छायाचित्र पोस्ट करत ‘आज अनेक विषयांवर उत्साहपूर्वक अन् रचनात्मक चर्चेसाठी काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे धन्यवाद. आम्ही सर्व भारताच्या लोकांच्या सेवेकरता वाटचाल करत असून याप्रकरणी आम्ही एकत्र आहोत’ अशी टिप्पणी केली आहे. तर बैठकीनंतर थरूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. सर्वकाही सुरळीत असून आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत असे म्हणत थरूर यांनी केरळमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दावा करत नसल्याचे नमूद केले आहे.
थरूर यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. तर काँग्रेस नेतृत्वाने केरळ निवडणुकीपूर्वी थरूर यांच्या तक्रारी दूर करण्याच्या प्रयत्नांचे आश्वासन दिले आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर थरूर यांचे काँग्रेस नेतृत्वासोबतचे संबंध वेगाने बिघडल्याचे दिसून आले. तिरुअनंतपुरमचे खासदार असलेल्या थरूर यांनी पंतप्रधान मोदींचे अनेकदा कौतुक केल्याने काँग्रेसची कोंडी झाली होती.