मणिपूरमध्ये 11 केंद्रांवर पुनर्मतदानाचे आदेश
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघातील 11 केंद्रांवर 22 एप्रिल रोजी पुनर्मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. या मतदान केंद्रांवर 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसा आणि तोडफोळ झाली होती.
साजेब, खुरई, थोंगम, लेइकाई बामन कंपू (नॉर्थ-ए), बामन कंपू (नॉर्थ-बी), बामन कंपू (साउथ-वेस्ट), बामन कंपू (साउथ-ईस्ट), खोंगमान जोन-व्ही (ए), इरोइशेम्बा, इरोइशेम्बा ममांग लेइकाई, इरोइशेम्बा मयाई लेइकाई आणि खैदेम माखा येथे पुन्हा मतदान होणार आहे.
हिंसाप्रभावित मणिपूरच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघ म्हणजेच इनर आणि आउटर मणिपूरसाठी 19 एप्रिल रोजी 72 टक्के मतदान झाले होते. मतदानादरम्यान अनेक केंद्रांवर गोळीबार, ईव्हीएममध्ये तोडफोड आणि बूथ कॅप्चरिंगच्या घटना घडल्या होत्या.
विष्णूपूर जिल्ह्यातील थमनपोकपीममध्ये मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारात 3 जण जखमी झाले होते. तर इंफाळ पूर्वच्या थोगंजूच्या एका केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली होती. हिंसक घटनांमुळे आयोगाने 11 मतदान केंद्रांवरील मतदान अमान्य घोषित केले. परंतु काँग्रेसने मतदान केंद्रांवर कब्जा करणे आणि प्रक्रियेत गैरप्रकार घडल्याचा आरोप करत राज्यातील 47 केंद्रांवर पुनर्मतदान करविण्याची मागणी केली होती. यात इनर मणिपूरमधील 36 तर आउटर मणिपूरमधील 11 मतदान केंद्रे सामील होती.
मागील वर्षापासून तणाव
मणिपूरमध्ये मागील वर्षाच्या 3 मे पासून कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान आरक्षणावरून हिंसा सुरू आहे. आउटर मणिपूर मतदारसंघाच्या हिंसाप्रभावित भागांमधील काही मतदान केंद्रांवर 26 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्यातही मतदान होणार आहे. राज्यात कुकी संघटनांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली होती. राज्यात आतापर्यंत झालेल्या हिंसक घटनांमध्ये 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 65 हजारांपेक्षा अधिक जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे.
मणिपूरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष
मणिपूरमध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपने राज्यातील स्थानिक पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंटसोबत आघाडी केली आहे. भाजपने केवळ इनर मणिपूर मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे. आउटर मणिपूर मतदारसंघात भाजपने नागा पीपल्स फ्रंटला पाठिंबा जाहीर केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दोन्ही जागांवर विजय मिळविला होता.