मणिपूरमध्ये 6 स्थानी फेरमतदान
मणिपूरच्या सहा मतदानकेंद्रांमध्ये पुनर्मतदान करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मतदानकेंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच मतदान उधळण्याचा प्रयत्न समाजविरोधी शक्तींनी केला होता. त्यामुळे पुन्हा मतदानाचा आदेश देण्यात आला आहे.
या मोडतोड प्रकरणी अज्ञान व्यक्तींच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मणिपूरमधील कुकी-झोमी समाजाने मतदानावरच बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असून या समाजाच्या लोकांनी मतदानात भाग घेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून या समाजाच्या नेत्यांनी ‘नो जस्टीस, नो व्होट’ असा नारा आपल्या समाजासाठी दिला आहे.
प्रथम टप्प्यानंतरही आदेश
पुनर्मतदान घोषित करण्याची ही मणिपूरमधील या निवडणुकीतील दुसरी वेळ आहे. मतदानाच्या प्रथम टप्प्यानंतरही 11 मतदानकेंद्रांमध्ये असा आदेश देण्यात आला होता. नंतर तेथील पुनर्मतदान शांततेने पार पडले होते. काही माहिन्यांपूर्वीच या राज्यात मोठा हिंसाचार झालेला असूनही मतदान टक्केवारी मोठी राहिली आहे.
नेत्यांचे बोल...
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच आरक्षणाचे समर्थन केले आहे. संघाच्या संदर्भात काही लोक आरक्षणाचे निमित्त करुन भ्रम फैलावत आहेत. पण या देशातील सूज्ञ लोक अशा समाजविरोधी लोकांवर विश्वास ठेवत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दलितांच्या सन्मानासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.’
- मोहन भागवत (सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
‘ममता बॅनर्जी या दहशतवाद्यांची पाठराखण करतात. त्यांना या देशात मजबूत सरकार नव्हे, तर मजबूर सरकार हवे आहे. संदेशखाली येथे सापडलेला शस्त्रसाठा ममता बॅनर्जी यांची दहशतवाद्यांकरीता असणारी सहानुभूती दाखवून देतो. यावेळी प. बंगालमधील मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत.’
- जगतप्रकाश नड्डा (अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष)
‘राहुल गांधी यांचे सल्लागार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकच आहेत. त्यांचा सल्ला मानल्याने काँग्रेसचा नाश होत आहे. पण त्याकडे लक्ष द्यायचे सोडून राहुल गांधी पदयात्रा आणि न्याययात्रा करीत बसले आहेत. अशा रितीने त्यांची वर्तणूक राहिल्यास काँग्रेसला कोणतेही भवितव्य उरणे शक्य राहणार नाही.’
- बद्रुद्दिन अजमल (अध्यक्ष, एआययुडीएफ)
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा समजून घेतलेला नाही. ते आपल्या कल्पनेप्रमाणे त्याचा अर्थ लावत आहेत. काँग्रेसने कधीही वारसा कर लागू करणार असे म्हटलेले नाही. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात जनहिताच्या योजनांची आश्वासने दिली आहेत, याची जाणीव ठेवावी.’
- पी. चिदंबरम (माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते)