चन्नम्मा चौकातील ‘तो’ कचऱ्याचा ढीग हटवा
महापौर सविता कांबळे यांची सूचना
बेळगाव : शुक्रवारी वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरामध्ये असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील झाडासभोवती असलेली माती तसेच सदाशिवनगर येथील रस्त्या शेजारी ठेवण्यात आलेल्या कचऱ्याची पाहणी बुधवारी महापौर सविता कांबळे यांनी केली. त्यानंतर तातडीने हा परिसर स्वच्छ करण्याची सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. शुक्रवारी शहर परिसरात वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त वडाच्या झाडांची पूजा केली जाते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. सध्या चन्नम्मा चौकातील गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्यामुळे त्या परिसरात मातीचा ढीग तसेच इतर कचरा पडून होता. याची माहिती महापौरांना मिळाली. तातडीने महापौरांनी त्या चौकाला भेट दिली. तो परिसर स्वच्छ करण्याची सूचना केली. यावेळी महापालिकेचे साहाय्यक अभियंता अदिलखान पठाण यांनाही चांगलेच धारेवर धरले.
सदाशिवनगर परिसरातील कचराही हटवा
सदाशिवनगर परिसरातही गटारीतील कचरा काढून टाकण्यात आला होता. तो तसाच पडून होता. तो कचराही हटवावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी असलेला कचरा तातडीने हटवण्याबाबत त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले आहे.