मच्छीमार जेटींवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा !
रत्नागिरी :
रत्नागिरीतील महत्वाच्या मच्छीमार जेटीवर ठराविक मांडणी अतिक्रमण करून पारंपरिक मच्छीमारांना व्यवसाय करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अशी अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी दर्यावर्दी हिंदू मच्छीमार संघटना, रत्नागिरी या पारंपरिक मच्छीमार संघटनेने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात त्यांनी निवेदन दिले असून त्यात म्हटल्याप्रमाणे, रत्नागिरीतील हिंदू समाजातील पारंपरिक मच्छीमार आहोत. आम्ही पारंपरिक पध्दतीने पकडलेले मासे, माशांच्या साठवणुकीसाठी लागणारे बर्फ आदी साहित्यासाठी आमच्या रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर नेहमी ये-जा सुरू असते.
मिरकरवाडा जेटी रत्नागिरीतील मच्छीमारांसाठी तसेच नौकेवरील आवश्यक साहित्य ये-जा करण्यासाठी शासनाने बांधलेली आहे. मिरकरवाडा जेटी व त्याच्या सभोवतालचा परिसर हा मत्स्य विभाग कार्यालयाच्या अखत्यारित येतो. मात्र मागील काही वर्षापासून मिरकरवाडा जेटीवर व त्याच्या सभोवतालच्या परिसरावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. मिरकरवाडा जेटी आवारात अनेक अनधिकृत पक्क्या बांधकामाच्या शेड, दुकान गाळे बांधण्यात आले आहेत.
तसेच जेटीच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गावर ठराविक व्यक्तींकडून मासे विकले जात आहेत. यामुळे सामान्य नागरिक व आमच्यासारख्या पारंपरिक मच्छीमारांना मिरकरवाडा जेटीचा उपभोग घेण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे.. तसेच अशाच प्रकारचे अतिक्रमण रत्नागिरीतील राजीवडा, की साखरतरसारख्या सर्वच जेटींवर होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मिरकरवाडा व अन्य जेटीवर असलेली अनधिकृत बांधकामे त्वरित हटवण्याची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.