रस्त्यावर आडव्या आलेल्या फांद्या हटवा
बाची पट्ट्यातील फांद्या तोडण्याची मागणी
उचगाव : उचगाव फाटा ते बाची जवळील कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये अनेक झाडांच्या फांद्या रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला अडचण होत असल्याने सदर फांद्या तातडीने तोडाव्यात अशी मागणी या भागातील या नागरिकांतून केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठमोठे वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर आडव्या आल्या आहेत. सध्या या रस्त्यावरून उसाचे ट्रक, ट्रॅक्टर तसेच इतर मालवाहू वाहने माल भरून जात असताना या फांद्या वाहनाला लागून अपघात घडत आहेत. तसेच या फांद्या केव्हाही रस्त्यावर कोसळून प्रवाशांनाही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तुरमुरी गावानजीक एक मोठा वृक्ष वाळलेला असून गेल्या अनेक महिन्यापासून सदर वृक्ष तसाच आहे. या संदर्भात अनेक वेळा वृक्ष काढण्यात यावा अशी विनंती करून देखील अद्याप काढलेला नाही. सदर वृक्ष रस्त्यावर कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यासाठी वाळलेला वृक्षही तातडीने काढावा अशीही मागणी करण्यात येत आहे. वन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने याची दखल घेऊन या फांद्या हटवाव्यात आणि वाहतुकीला होणारी अडचण दूर करावी अशी मागणी सर्व थरातून करण्यात येत आहे.