महानगरपालिकेतून अर्ज क्र. 2 देण्यास टाळाटाळ
जनतेला नाहक हेलपाटे : मनपा आयुक्त लक्ष देणार का?
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये 2 क्रमांकाचा अर्ज देण्यासाठी विलंब लावला जात आहे. संबंधित विभागाकडे अर्ज मागितल्यानंतर दुपारी या, उद्या या, चार दिवसांनी या अशी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे नागारिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत योग्य ती सूचना द्यावी, अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेतून मिळणारा अर्ज क्र. 2 हा महत्त्वाचा आहे. पीआयडी क्रमांकासाठी या अर्जाची नितांत गरज असते. मात्र हा अर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. बऱ्याचवेळा तर आम्ही हा अर्ज देणे बंद केले आहे, असे उत्तर दिले जात आहे. एकाला एक नियम तर दुसऱ्याला एक नियम असे का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. महानगरपालिकेमध्ये चर्चा करून या अर्जाचे वितरण केले जाते. ज्यावेळी अर्जाचे वितरण करण्यास सुरुवात होते, त्यावेळी उद्या या... अशी उत्तरे दिली जात आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे, अशी मागणी होत आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना करा
महानगरपालिकेमधून चलनही लवकर भरून दिले जात नाही. त्यामुळे नाहक हेलपाटे खावे लागत आहेत. तेव्हा महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी होत आहे.
सरकारी कार्यालयामध्ये वाढले एजंटराज
महानगरपालिका, एडीएलआर कार्यालय, सर्व्हे, रेकॉर्ड, अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच इतर कार्यालयांमध्ये एजंटराज पुन्हा फोफावत चालले आहे. सर्वसामान्य जनता कामानिमित्त गेली असता कशासाठी आला, कोणते काम आहे? अशी विचारणा त्या एजंटांकडून केली जात आहे. त्यानंतर मी ते काम लवकर करून देईन, असे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळली जात आहे. लवकर काम होत नसल्याने सर्वसामान्य जनताही रक्कम देऊन कामे करून घेतात. हा प्रकारही थांबणे गरजेचे आहे. याकडे आता नूतन जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.