भारतात धार्मिक स्वातंत्र्य : अमेरिका
भारतविरोधी अहवाल खोटे : अमेरिकेच्या प्रसारमाध्यमाने केला होता दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांकडून सातत्याने भारतात मुस्लिमांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप होतोय. न्यूयॉर्क टाईम्सने अलिकडेच भारतात राहत असलेल्या मुस्लीम परिवारांना वेगळे पाडण्यात आले असल्याचा दावा केला होता. यावर अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने स्पष्टीकरण देत भारतात धार्मिक स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सचा दावा आम्ही फेटाळत आहोत. अमेरिका जगभरात धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्पर आहे. आम्हाला याकरता भारतासमवेत अनेक देशांची साथ मिळाली असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी नमूद केले आहे.
भारतात मुस्लिमांची गळचेपी होत असल्याचा स्वत:चा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालही अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने नाकारला आहे. यापूर्वी व्हाईट हाऊसने जगात भारतापेक्षा अधिक जिवंत लोकशाही अन्य कुठेच नसल्याचे तसेच भारतीयांची मतदानाची आणि सरकारविरोधात आवाज उठविण्याची क्षमता कौतुकास्पद असल्याचे म्हटले होते.
भारतात लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून अमेरिकेतील प्रसारमाध्यमांकडून सातत्याने देशाविरोधात वृत्तं प्रकाशित केली जात आहेत. या प्रसारमाध्यमांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष स्वरुपाला धोका असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास देशात मुस्लिमांच्या विरोधात हिंसा वाढेल तसेच भारत सरकार मुस्लिमांना बाजूला करणार असल्याची भीती अमेरिकेच्या प्रसारमध्यमांकडून व्यक्त करण्यात येतेय.
देशात कुणाची गळचेपी नाही
संबंधित वृत्तअहवालांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच फेटाळले आहे. देशात कुठल्याही समुदायाची गळचेपी होत नाही. भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा दावा खोटा आहे. जनतेने अशा खोट्या दाव्यांपासून दूर रहावे असे पंतप्रधानांनी यापूर्वीच म्हटले आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने एक अहवाल सादर करत 1950-2015 पर्यंत भारतात मुस्लिमांची लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढल्याचे दाखवून दिले आहे. याउलट याच कालावधीत हिंदूंच्या लोकसंख्येत 7.82 टक्क्यांची घट झाली आहे.