राहुल गांधी यांच्यासमोर धर्मसंकट
रायबरेली का वायनाड याचा निर्णय घ्यावा लागणार
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
संसद सदस्यत्वासाठी रायबरेली आणि वायनाड यापैकी एका मतदारसंघाची निवड करण्याचे धर्मसंकट माझ्यासमोर निर्माण झाले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे देव नाही, तर एक मनुष्य असल्यानेच हे धर्मसंकट उभे ठाकले असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केले आहे. वायनाड तसेच रायबरेली यापैकी एका मतदारसंघाची निवड करण्याचे धर्मसकंट माझ्यासमोर उभे ठाकले आहे. वायनाड आणि रायबरेलीचे लोक माझ्या निर्णयामुळे आनंदी होतील अशी अपेक्षा असल्याचे म्हणत राहुल यांनी द्वेषाला प्रेमाने तर अहंकाराला विनम्रतेने पराभूत केल्याचे उद्गार काढले आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेली तर केरळमधील वायनाड मतदारसंघात विजय मिळविला आहे.
राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघात भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना 3,90,030 मतांनी पराभूत केले होते. तर वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी भाकपच्या उमेदवार एनी राजा आणि भाजप उमेदवार सुरेंद्रन यांना पराभूत केले आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु अमेठीत त्यांना भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर यंदा राहुल गांधी दोन्ही मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांना एक मतदारसंघ निवडावा लागणार आहे. अशा स्थितीत दुसऱ्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.