गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना दिलासा
काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी : यमकनमर्डी मतदारसंघात प्रचार
बेळगाव : राज्य सरकारने गॅरंटी योजना जारी करून नागरिकांना मोठी सुरक्षा दिली आहे. मात्र, भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून गेल्या दहा वर्षांत केवळ खोटी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल केली आहे, असा आरोप सतीश शुगर्सचे संचालक युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केला. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात चिकोडी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्यासाठी प्रचार करून आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. चिकोडी लोकसभा मतदारसंघातून आपली बहीण प्रियांका जारकीहोळी या निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाकडून राज्यामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आल्या आहेत. यासाठी मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा. भाजपकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मतदारांचा विश्वास त्यांनी गमावला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून ‘बोले तैसा चाले’ हे वचन पाळले आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपकडून केवळ देशाचे राजकारण केले जात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. याची जाणिव ठेवून मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन जनसामान्यांचे सरकार आणावे. भाजपने गेल्या दहा वर्षांत देशातील जनतेला महागाई व्यतिरिक्त काहीच दिले नाही. श्रीमंत उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपच्या या पक्षपाती धोरणाला मतदारांनी योग्य धडा शिकविला पाहिजे. ती वेळ आता आली असून मतदारांनी जागरुक राहून मतदान करावे, असे आवाहन राहुल जारकीहोळी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.