किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी
.26 कोटी शेतकऱ्यांना झाला लाभ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगाआरती
वृत्तसंस्था/ वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी उत्तरप्रदेशच्या वाराणसी येथे शेतकरी संमेलनाला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या 9.26 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम 17 वा हप्ता म्हणून जारी केली आहे. याचबरोबर वाराणसी येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते गंगाआरती झाली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गंगा आरतीत भाग घेतला.
पंतप्रधान मोदींनी कृषी सखी म्हणून मान्यताप्राप्त 30 हजारांहून अधिक राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनशी संबंधित स्वयंसहाय्य गटांना देखील प्रमाणपत्र जारी केले. यात वाराणसीतील 212 कृषी सखी सामील होत्या.
आम्ही आशा कार्यकर्त्यांच्या रुपात भगिनींचे कार्य पाहिले आहे. डिजिटल इंडिया साकारण्यात भगिनींची मोठी भूमिका आहे. आता आम्ही कृषी सखीच्या रुपात शेतीला नवी ऊर्जा मिळताना पाहणार आहोत. कृषी सखी ही योजना सध्या 12 राज्यांमध्ये सुरू झाली आहे. आगामी काळात पूर्ण देशात हजारो समूह याच्याशी जोडले जातील. हे अभियान 3 कोटी लखपति दीदी निर्माण करण्यासही मदत करणार असल्याचे मोदी म्हणाले.
शेतकरी आत्मनिर्भर होत आहेत. जागतिक बाजरात देशाच्या कृषिक्षेत्राला मोठे स्थान मिळवून द्यायचे आहे. जगातील प्रत्येक डायनिंग टेबलवर भारतीय कृषी उत्पादनांना स्थान मिळावे असे माझे स्वप्न आहे. पीएम किसान समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी सपोर्ट सिस्टीम विकसित केली जात असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
पीएम किसान सन्मान निधी आता जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना ठरली आहे. आतापर्यंत देशाच्या कोट्यावधी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 3.15 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीत योग्य लाभार्थीपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाल्याचा आनंद आहे. युवा, नारीशक्ती आणि गरीब या सर्वांना मी भारताचा मजबूत स्तंभ मानतो. स्वत:च्या तिसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभी पहिला निर्णय शेतकरी आणि गरीब कुटुंबांशी निगडित घेतला. देशभरात गरीब कुटुंबांसाठी तीन कोटी घरं निर्माण करणे असो किंवा पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू ठेवण्याचा निर्णय कोट्यावधी लोकांना मदत करणार असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.