पडीक जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे
पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची आवश्यकता
बेळगाव : दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाई काही अंशी कमी करण्यासाठी शहर परिसरातील पडीक जलस्त्राsतांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि संवर्धनासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे. पावसाअभावी यंदा सर्वत्र पाणीटंचाईचे संकट गडद होवू लागले आहे. शहरात आठ दिवसांआड पाण्याचा पुरवठा होवू लागला आहे. अशा परिस्थितीत पडीक असलेल्या विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्त्राsतांचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी असूनदेखील वापर नसलेल्या विहिरी, कूपनलिकांची संख्या अधिक आहे. काही विहिरी आणि कूपनलिका किरकोळ दुरुस्तीअभावी वापराविना पडून आहेत. अशा विहिरी आणि कूपनलिकांची दुरुस्ती करून पुन्हा पाण्यासाठी वापर केल्यास सोयीचे ठरणार आहे.
विहिरीतील कचरा, गाळ काढून पुनर्वापराची गरज
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत दोन फुटाने घट झाली आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच शहरात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. शासनाने पाण्यासाठी विविध योजना राबविल्या असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांचे पाण्याविना हाल होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील वापराविना पडून असलेल्या विहिरींचा उपयोग होणे आवश्यक आहे. शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरीतील कचरा गाळ काढून पुनर्वापर व्हावा, अशी मागणीही होत आहे.
विहिरीतील पाण्याचा वापर गरजेचा
शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करून पाण्यासाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. अनेक विहिरींना पाण्याचा मुबलक साठा आहे. मात्र अशा विहिरींकडे दुर्लक्ष झाले आहे. विहिरींच्या आजुबाजूची स्वच्छता करून गाळ काढल्यास पाण्याचा वापर होणार आहे. हुतात्मा स्मारक परिसरात असलेली विहीर, नवग्रह शेजारी असलेली विहीर यासह इतर ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाण्याचा वापर झाल्यास दैनंदिन पाणी पुरवठ्यावरील ताण काहीसा कमी होणार आहे.