आगामी काळ प्रादेशिक पक्षांचा : केसीआर यांचा दावा
भविष्यात प्रादेशिक पक्षांचेच राजकारणात वर्चस्व राहणार आहे. काँग्रेस आणि भाजपने तेलंगणासाठी प्रामाणिकपणे काम केलेले नाही. तेलंगणसाठी कुणाचा विजय चांगला संकेत आहे हे लोक चांगल्याप्रकारे जाणून असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी खम्माम येथील सभेला संबोधित करताना म्हटले आहे.
भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी कधी तेलंगणाचा ध्वज हाती घेतला आहे का? जेव्हा आम्ही राज्यासाठी संघर्ष सुरू केला, तेव्हा केवळ आमचा अपमान करण्यात आला, आमच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि आम्हाला तुरुंगात डांबण्यात आले. राज्यातील काँग्रेसचे नेते हे दिल्लीतील स्वत:च्या पक्षश्रेष्ठींच्या इशाऱ्यांवर काम करत असल्याची टीका केसीआर यांनी केली आहे.
आम्ही दिल्लीच्या गुलामांच्या अधीन राहून गुलाम व्हावे का? आगामी काळ हा प्रादेशिक पक्षांचा असणार असल्याचे म्हणत केसीआर यांनी खम्माम येथे बीआरएसच्या शासनकाळात झालेल्या विकासकामांचा उल्लेख केला आहे.
यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने 2004-14 दरम्यान अल्पसंख्याकांच्या विकासावर केवळ 900 कोटी रुपये खर्च केले होते, तर बीआरएस सरकारने मागील साडेनऊ वर्षांमध्ये अल्पसंख्याकांच्या कल्याणावर 12 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. अल्पसंख्याकांना कशाप्रकारे मतपेढीचे स्वरुप देण्यात आले, मतदारांना कशाप्रकारे लुटण्यात आले हे लोक ओळखून आहेत. बीआरएस सर्व समुदायांना सोबत घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तेलंगणा एक धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून कायम राहणार असल्याचा दावा केसीआर यांनी केला आहे.