कारवार किनारपट्टीवर पुन्हा रेडअलर्ट
जोरदार पावसामुळे कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावरसह भटकळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी/ कारवार
जिल्ह्याच्या किनारपट्टीला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली आहे. दि. 22 पर्यंत आणखी काही दिवस पावसाचा जोर टिकून राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा किनारपट्टीवर रेडअलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसामुळे किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारपट्टीवरील इतर तालुक्यांच्या तुलनेत कुमठा तालुक्यात पावसाचा मारा अधिक आहे. त्यामुळे कुमठा, सिद्धापूर रस्ता ठिकठिकाणी पाण्याखाली गेला आहे. या रस्त्यावरील हारोडा येथे सुमारे 100 मीटर लांबीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांची पंचाईत झाली होती. कुमठा तालुक्यातील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वरही ठिकठिकाणी पाणी साचले आहे. कुमठा तालुक्यात काही ठिकाणी घरांची पावसामुळे पडझड झाली असून पडझड झालेल्या घरांचा नेमका आकडा समजू शकला नाही. कुमठा तालुक्यात काही ठिकाणी संततधार पावसाच्या सरी तर अन्य काही ठिकाणी पाऊस विश्रांती घेऊन कोसळत आहे. पावसामुळे शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. सुदैवाने किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मर्यादित असल्याने जीवितहानी किंवा वित्तीय हानीची घटना घडलेली नाही. जोरदार पावसामुळे अंकोला तालुक्यातील हारवाड येथे केएसआरटीसीची बस अपघातग्रस्त झाली आहे. ही बस अंकोलाहून कारवारकडे निघाली होती.
कारवार तालुक्यात पहाटेपासून पाऊस
कारवार तालुक्यात मंगळवारी पहाटे 3 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर काहीवेळ विश्रांती घेतलेल्या पावसाने 8 वाजल्यापासून पुन्हा झोडपून काढायला सुरुवात केली आहे. कधी जोरदार तर कधी अल्प प्रमाणात सलगपणे पडणाऱ्या पावसामुळे कारवार तालुक्यातील वातावरण ‘पाऊसमय’ बनून गेले आहे.
मच्छीमारी बंदरे होड्यांनी गजबजली
किनारपट्टीवरील खराब वातावरणामुळे जिल्हा प्रशासनाने मच्छिमारी बांधवांना समुद्रात न उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मच्छीमारी होड्या समुद्रात परतल्या आहेत. परिणामी किनारपट्टीवरील बैतखोल, मुदगा, तदडी, होन्नावर, बेलेकेरी आदी मच्छीमारी बंदरे होण्यांच्या उपस्थितीने गजबजून केली आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे मासेमारीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मत्स्य व्यवसाय ठप्प झाला आहे.
समुद्र किनारे बनले निर्मनुष्य
जिल्हा प्रशासनाने प्रवाशांची आणि पर्यटकांच्या समुद्र किनारपट्टीवरील वावरावर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या अनेक आठवड्यापासून पर्यटकांच्या उपस्थितीने फुलून जाणारे किनारपट्टीवरील सर्व समुद्र किनारे निर्मनुष्य बनून गेले आहे.
अंगणवाड्यांना आज सुटी