कडोली-काकती मार्कंडेय बंधाऱ्यालगतच्या खचलेल्या रस्त्याचे पुनर्बांधकाम सुरू
कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांतून समाधान : दर्जेदार काम करण्याची मागणी
वार्ताहर /काकती
‘कडोली-काकती संपर्क रस्ता, मार्कंडेय बंधाऱ्यालगतचा रस्ता खचला’ अशी बातमी ‘तरुण भारत’ला 30 मार्चच्या प्रसिद्ध झाली होती. परिणामी अवघ्या तीन दिवसात म्हणजे 4 एप्रिलपासून रस्ता कामाला ‘तरुण भारत’ इफेक्टमुळे सुरुवात झाली आहे. यामुळे कडोली-काकती व संबंधीत गावातील ग्रामस्थांमधून थेट रस्ता कामाला सुरुवात झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. यापूर्वी पावसाळ्यातील पाण्याच्या मोठ्याप्रमाणात विसर्गामुळे दोन-तीन वेळा रस्ता खचला होता. नदीच्या पात्रात नदीच्या पातळीपेक्षा कमी खोदाई व कॉलम-बीमचा वापर न करता बांधकाम कमी प्रतीचे करण्यात आले होते. परिणामी दरवर्षी रस्ता खचत होता व निधी वाया जात होता. आता बांधकामाला सुरुवात झाले असून खोदाईचे काम नदीपात्रापेक्षा खोल करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्राकडील भिंत कॉलम-बीमच्या आधारावर बांधल्यास भक्कम होणार आहे. या नदीकडील बाजूने रस्त्याचे बांधकाम दर्जेदार झाल्यास रस्ता खचणार नाही. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. रस्ता दर्जेदार होण्यासाठी जि. पं. कार्यकारी अभियंता यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण या सरकारी अभियंत्याला उत्कृष्ट काम करून घेण्याचा अधिकार आहे. रस्ता न खचता भक्कम कसा करण्यात येणार आहे, याची उत्कंठा ग्रामस्थांना लागून राहिली आहे.