आरसीबीचा ‘रॉयल’ थाट लखनौ जायंट्सवर 5
लखनौ जायंट्सवर 5 गड्यांनी पराभूत : विजयासह आरसीबी गुणतालिकेत अव्वलस्थानी भुवनेश्वर-रसीख जोडी ठरली भारी :
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रसीख सलाम आणि भुवीच्या भेदक माऱ्यानंतर विराट कोहलीच्या इम्पॅक्टफुल खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने लखनौवर दणदणीत विजय मिळवला. आरसीबीने घरच्या मैदानातील या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर आरसीबीने लखनौला 146 धावांत ऑलआउट केले. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना बंगळुरुच्या संघाने 5 विकेट्स राखून फक्त 91 चेंडूत सामना खिशात घातला. विशेष म्हणजे, विराट कोहली आयपीएल इतिहासात प्रथमच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला.
प्रारंभी, आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौच्या फलंदाजांना हवी तशी सुरुवात करून देता आली नाही. सलामीला आलेल्या मिचेल मार्शने 40 धावांचे योगदान दिले तर एडन मारक्रम अवघ्या 12 धावा करून माघारी परतला. कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला केवळ एकच धाव करता आली. याशिवाय, स्टार फलंदाज निकोलस पूरन देखील 1 धाव करून बाद झाला. शेवटी आयुष बडोनीने 38 धावांचे बहुमूल्य योगदान दिले. गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून विजय मिळवून देणाऱ्या मुकुल चौधरीने 39 धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली. अखेरीस लखनौचा डाव 146 धावांवर आटोपला.
आरसीबीचा दणकेबाज विजय
लखनौने विजयासाठी दिलेल्या 147 या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीचा स्टार फलंदाज फिल सॉल्ट अवघ्या 7 धावंवर परतला. यानंतर देवदत्त पडिक्कल हा देखील 10 धावांवर माघारी फिरला. या दोन विकेट्स गमावल्यावर शंभर टक्के फिट नसलेल्या विराट कोहलीने 34 चेंडूत 49 धावांची खेळी करत लखनौच्या गोलंदाजांची हवाच काढून घेतली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावल. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला आवेश खानने बाद केले. कर्णधार रजत पाटीदारने 13 चेंडूत 27 धावांची धमाकेदार खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. जितेश शर्मा 9 चेंडूत 23 धावांची खेळी करुन परतल्यावर टीम डेविड 14 (8) आणि रोमारियो शेफर्ड 14 (8) या दोघांनी 16 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आरसीबीचा विजय निश्चित केला.
आँरेज कॅप विराटकडे
लखनौविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने 49 धावांची खेळी केली आणि सनरायझर्स हैदराबादच्या हेनरिक क्लासेनच्या तो पुढे गेला. क्लासेनने 5 सान्यात दोन अर्धशतकांच्या मदतीने 224 धावा केल्या होत्या. आता विराट कोहलीने 2 अर्धशतकांच्या मदतीने पाच सामन्यात 228 धावा केल्या आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
