आरबीआयच्या निर्णयाने शेअरबाजारात उसळी
सेन्सेक्स 447 अंकांनी मजबूत : निफ्टीही वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीच्या अहवालानंतर मोठी तेजी दिसून आली. यामध्ये आरबीआयने रेपोदरात कपात केल्याने बाजाराला आधार मिळाला आहे. आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेपो दर 5.25 टक्क्यांवर आला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 85,125 वर उघडला, तर अंतिम क्षणी बीएसई सेन्सेक्स 447.05 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 85,712.37 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 152.70 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 26,186.45 वर बंद झाला आहे. बेंचमार्क निर्देशांकाच्या तुलनेत, मिडकॅप आणि स्मॉलपॅप निर्देशांकांची कामगिरी अत्यंत खराब होती. बीएसई मिडकॅप 0.20 टक्के वाढला तर बीएसई स्मॉलकॅपमध्येही 0.67 टक्के घट झाली. देशांतर्गत संकेत संमिश्र होते, परंतु मजबूत आर्थिक आकडेवारी, रुपयातील तेजी आणि आरबीआयच्या धोरण घोषणेनंतर गुंतवणूकदारांना आत्मविश्वास मिळाला.
बँकिंग आणि आयटी सर्वाधिक चमकणारे समभाग होते. आघाडीवर स्टेट बँक ऑफ इंडिया होती, ज्यांचे शेअर्स 2.53 टक्क्यांनी वधारले. त्यानंतर, बजाज फिनसर्व्ह 2.08 टक्के, मारुती 1.8 टक्के, बजाज फायनान्स 1.75 टक्के आणि एचसीएल टेक 1.63 टक्क्यांनी वाढीसह तेजीच्या यादीत राहिले. लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा आणि इन्फोसिस देखील सुमारे एक टक्क्याने वधारले. खाजगी बँकिंग समभागांमध्ये, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक देखील किरकोळ वाढले. तथापि, काही मोठ्या नावांमध्येही घसरण झाली. हिंदुस्थान युनिलीवरचे शेअर्स सर्वाधिक 3.38 टक्क्यांनी घसरले. याशिवाय, ट्रेंट, सन फार्मा आणि काही इतर कंपन्या देखील लाल चिन्हावर बंद झाल्या.