रत्नागिरी जिल्ह्यात 426 ग्रामपंचायतींवर महिलाराज, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
आरक्षण लॉटरीनंतर 847 ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांडून मोर्चेबांधणीला सुरुवात
रत्नागिरी : जिल्ह्यातील 847 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाकडे डोळा ठेवून बसलेल्या अनेकांचे नशीब फळफळले तर कित्येकांना गुडघ्याला बांधून ठेवलेली बाशिंगे पुन्हा उतरवून ठेवण्याची वेळ आली. आरक्षण लॉटरीनंतर इच्छुकांनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आरक्षण सोडत काढलेल्या 847 पैकी 426 ग्रामपंचायतींवर महिलाराज प्रस्थापित होणार आहे.
सरंपचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी प्रत्येक तालुक्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी काढण्यात आली. तालुकानिहाय सरपंच पदे वेगवेगळे प्रवर्ग आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरीता (2025 ते 2030) आरक्षित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 36 तर या प्रवर्गात महिलांसाठी 18, अनुसूचित जमातीसाठी 11 व या प्रवर्गात महिलांसाठी 6, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 229 व महिलांसाठी 116 तसेच खुल्या प्रवर्गांसाठी 571 व महिलांसाठी 286 निश्चित केलेल्या जागांसाठी आरक्षणाची लॉटरी फुटली.
जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील 49, दापोलीमधील 106, खेडमधील 114, चिपळूणमधील 130, गुहागरमधील 66, संगमेश्वरमध्ये 127, रत्नागिरीतील 94, लांजा 60 आणि राजापूरातील 101 ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली.
निवडणुकीची लगबग सुरू
आरक्षण सोडतीकडे विविध राजकीय पक्षांसह सर्वसामान्य ग्रामस्थांचेही लक्ष वेधले होते. सोडतीनंतर सरपंचपदासाठी आपला अथवा आपला हक्काचा माणूस बसला पाहिजे यासाठी गावपातळीवर लगबग सुरू झाली आहे. सरपंचपदाची खुर्ची काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांकडूनही मोर्चेबांधणीला जोर चढणार आहे. आरक्षण बदलामुळे अनेक गावातील काही इच्छुकांचा भ्रमनिरास तर काही ठिकाणी वर्षानुवर्षांची असलेली मक्तेदारी मोडीत निघाली आहे.