रत्नागिरी जिल्ह्यातील 42 जण सुरक्षित, जिल्हा प्रशासन संपर्कात
जिह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित
रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
रत्नागिरीमधील साक्षी संदीप पावसकर (26) आणि ऊचा प्रमोद खेडेकर (21), या सिंधुदुर्गातील 6 नातेवाईकांसोबत 20 एप्रिल रोजी काश्मीर येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. हे सर्वजण 23 एप्रिल रोजी रात्री मुंबई येथे पोहोचणार आहेत. तसेच रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील खलिफ मुकादम कुटुंबातील 6 सदस्य 20 एप्रिल रोजी अमृता ट्रॅव्हल्समार्फत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. ते सर्व पर्यटक श्रीनगर येथे हॉटलमध्ये सुखऊप असून 25 एप्रिल रोजी विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत.
रत्नागिरी येथील मनोज जठार, अनुश्री जठार व इतर 32 असे एकूण 34 सदस्य 21 एप्रिल रोजी श्री टुरिझममार्फत रत्नागिरीमधून काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक जम्मू येथे सुखऊप आहेत. हे सर्वजण 24 एप्रिल रोजी रेल्वेने दिल्लीत येणार असून 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे पोहोचणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षामधून सर्व पर्यटकांना संपर्क झाला असून, ते सर्वजण सुखऊप आणि सुरक्षित आहेत.
रत्नागिरीतील 20 पर्यटकांशी, पालकमंत्र्यांचा संवाद
रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्याची माहिती समोर येताच पालकमंत्री उदय सामंत यांनी या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार तज्ञ म्हणून कार्यरत असलेले कुणाल देसाई यांच्या नेतृत्वाखाली 20 जणांचा पर्यटक गट श्रीनगरमध्ये गेला आहे. या गटात देसाई यांचे कुटुंबिय आणि त्यांच्या क्लिनिकमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. हा गट उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेला होता. मंत्री सामंत यांनी तात्काळ कुणाल देसाई यांच्याशी संपर्क साधला आणि गटातील सर्व 20 जण सुरक्षित असल्याची खात्री केली. तसेच प्रशासनाला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले.
पर्यटकांसाठी प्रशासनाचे आवाहन
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या मदतीसाठी 24 बाय 7 हेल्प डेस्क स्थापन केला आहे. संपर्क तपशील फोन : 0194-2483651, 0194-2457543, व्हॉट्सअॅप : 7780805144, 7780938397. रत्नागिरी जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना आपल्या ओळखीच्या व्यक्तींची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे. संपर्क: 02352-222233/226248 देण्यात आला आहे.
पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ला भ्याड - उदय सामंत
आमच्या देशाला पाकिस्तानने एवढ्या स्वस्तात घेऊ नये. अशा पद्धतीचा हल्ला भविष्यात होणार नाही अशा प्रकारची दहशत आणि अद्दल पाकिस्तानला घडली पाहिजे, हे नागरिक म्हणून माझं मत आहे. मात्र अशावेळी सर्व देशाने एकत्र आलं पाहिजे. हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे. आपण स्वत:ला देशभक्त समजत असू तर अशावेळी सर्वानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्र सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.