रत्नागिरी तालुक्यात 47 महिलांना मिळणार सरपंचपदाचा मान
94 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी फुटणार लॉटरी, 22 एप्रिल रोजी आरक्षण सोडत
रत्नागिरी : तालुक्यामधील 94 ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित करण्याची असून या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत कार्यक्रम 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात घेण्यात येणार आहे. त्यात एकूण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 5, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 26, खुला प्रवर्गासाठी 63 आणि या सर्व प्रवर्गातून एकूण 47 महिलांना सरपंचपद आरक्षण मिळणार आहे.
मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2- अ(4) (6) नुसार सन 2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडील अधिसूचना आदेशाअन्वये तालुक्यामधील 94 ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित करण्याची आहेत.
या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 5 जागा तर महिलांसाठी 2, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 26 आणि महिलांसाठी 13, खुल्या प्रवर्गासाठी 63 व महिलांसाठी 32 जागांचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सर्व प्रवर्गातून एकूण 47 महिलांना सरपंच पद आरक्षण मिळणार आहे. सोडत कार्यक्रम 22 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी आरक्षण सोडतीच्या दिवशी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.