For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचारसंहितेमुळे रेशनकार्डचे काम पुन्हा लांबणीवर

10:58 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आचारसंहितेमुळे रेशनकार्डचे काम पुन्हा लांबणीवर
Advertisement

लाभार्थ्यांच्या पदरी निराशा : शासकीय सुविधांपासून वंचित : 6 जूनपर्यंत प्रतीक्षा

Advertisement

बेळगाव : मागील कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या नवीन रेशनकार्डचे काम पुन्हा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच राहिली आहे. परिणामी गोरगरीब जनतेला शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. कित्येक दिवसांपासून रेशनकार्डच्या कामाकडे डोळे लावून बसलेल्या लाभार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. मागील दोन वर्षांपासून रेशनकार्डचे काम अनियमित आणि विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे हजारो अर्ज पडून राहिले आहेत. शिवाय नवीन अर्ज करण्यासाठी हजारो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. मात्र, रेशनकार्ड वितरणाचे आणि अर्ज स्वीकृतीचे काम बंद आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच राहिली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री मुनियप्पा यांनी 1 एप्रिलपासून रेशनकार्डचे काम सुरू केले जाणार आहे, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाभार्थ्यांच्या नजरा 1 एप्रिलकडे लागल्या होत्या. मात्र, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक तारखांबरोबर आचारसंहिताही लागू केली आहे. त्यामुळे रेशनकार्डचे काम पूर्णपणे थांबले आहे. निवडणूक संपल्यानंतरच रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तब्बल 6 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत सद्यस्थितीत मानसी 5 किलो तांदूळ आणि 170 रुपये दिले जातात. त्याबरोबरच गृहलक्ष्मी योजनेसाठी रेशनकार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेकांनी रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. अनेक जण अर्ज करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, रेशनकार्डचे काम बंद असल्याने रेशनकार्डपासून वंचित राहावे लागले आहे. आता आचारसंहिता सुरू झाल्याने पुन्हा रेशनकार्डचे काम तीन महिन्यांसाठी थांबले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची निराशा झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.