Solapur News: रेशनकार्ड धारकांनी मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ सोडावा, महसूल प्रशासनाचे आवाहन
सन 2014 साली अन्नधान्य वितरण सुरक्षा कायदा मंजूर झाला आहे.
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात सवलतीच्या दरात मिळणार्या मोफत अन्नधान्याचा लाभ ज्या कार्डधारकांचे उत्पन्न वाढले आहे त्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांनी कार्डधारकांना केले.
राज्यशासनाने गरीब नागरिकांची परिस्थिती ओळखून त्यांना 1996 पासून रास्तभाव धान्य दुकानातून निर्धारीत केलेले कार्डधारक अंत्योदय,बी.पी.एल.,ए.पी.एल.असे संवर्ग करुन सवलतीच्या दरात अन्यधान्य विक्री केली जाते.
सन 2014 साली अन्नधान्य वितरण सुरक्षा कायदा मंजूर झाला आहे. त्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंबे असे संवर्ग करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा कायद्यानुसार ग्रामीण भागात 44 हजार रुपये तर शहरी भागात 59 हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित यासाठी केली आहे.
वरील बाबीचा विचार करता अनेक कुटूंबे सन 1996 पासून सवलतीच्या दराने धान्याचा लाभ घेत आहेत. दरम्यान, सन 2024 नंतर मंगळवेढा तालुक्यातील बर्यापैकी लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. काही कुटूंबांकडे चारचाकी वाहने आहेत. तसेच खाजगी व सरकारी नोकरीवर आहेत.
काही शेतकरी बागायतदार असल्याचेही दिसून येत. तर अशा शिधापत्रिका धारकांनी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणार्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून धान्य सोडणे आवश्यक आहे. धान्य सोडत नसल्याने सन 2024 पासून नवीन इस्टांकानुसार शासनाकडे मागणी करुन अद्यापपर्यंत ते प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेत लाभ देता येत नाही.
ज्या कुटूंबियाकडे चारचाकी वाहने तसेच दोन एकरा पेक्षा जास्त बागायत जमीन आहे. त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्ती खाजगी कंपनी किंवा शासकीय नोकरीस आहे. ज्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा सर्व कार्डधारकांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडून शासनास सहकार्य करावे.
- संतोष कणसे, प्रभारी तहसिलदार, मंगळवेढा