Ran Bhaji: डोंगर-दऱ्यांमधील औषधी रानभाज्या म्हणजे आयुर्वेदिक औषधांचा खजिना!
या रानभाज्या म्हणजे जिभेचा स्वादिष्ट खजिनाच होय
By : विजय पाटील
असळज : गगनबावडा म्हणजे मिनी महाबळेश्वर आहे. येथील डोंगर-दरीमध्ये असणारी विविध वनस्पती म्हणजे एक प्रकारे आयुर्वेदिक औषधांचा खजीनाच आहे. पाऊस पडला की, येथील डोंगर-दरीमध्ये रसायनमुक्त भाज्यांची उधळण दिसून येते.
या भाज्यांना ना कोणाचे लागवडीसाठी मार्गदर्शन असते, ना कोणी लागवड केली असते, ना कोणी त्यांना खत किंवा रसायन यांचा वापर केलेला नसतो, ना कोण त्यांना पाण्याचा पुरवठा करत नाही, त्यांना फक्त निसर्गच अन्न पाणी देत असतो. अशा या रानभाज्या म्हणजे जिभेचा स्वादिष्ट खजिनाच होय.
जिल्ह्याच्या काना-कोपऱ्यातील पै-पाहुण्यांना या भाज्या आवडीने दिल्या जातात. या भाज्या चवीने खाल्या जातात. गगनबावडा तालुक्यात पावसामुळे विविध प्रकारच्या रानभाज्यांची उगवण झाल्याने घरोघरी चविष्ट, रुचकर, खमंग, भाज्यांची मेजवानी पहावयास मिळत आहे.
निसर्गामध्ये कोणत्याही रासायनिक खताशिवाय डोंगर-दऱ्यात नागरिकांना औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या ज्यांची मागणी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही दिसून येते. अगदी सहजपणे डोंगरातील, शेतातील रस्त्याकडेला, शिवारात मोफत उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या अगदी चवीने चाखल्या जातात.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भाज्यामध्ये पानी, कई, भोपळी, शेंडवळ, झेंडू आळंबी, मोरशेंडवळ, आळू, गोमाटी, वायवरण यासारख्या मिळणाऱ्या अनेक औषधी रानभाज्यांचा यामध्ये समावेश होतो. या भाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. विविध आजारावर गुणकारी अशा या घरचा वैद्य स्वरुपातील रानभाज्याचे महत्व आहे.
शहरातही या भाज्या विक्रीसाठी शेतकरी उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण भागात त्याची लागवड नसल्याने त्याची उपलब्धता तुरळक आढळते. या दिवसामध्ये शेतकरी वर्गामध्ये आर्थिक चणचण दिसून येते. त्यामुळे दिवसभर शेतात राबत असताना शेताच्या बांधावर नैसर्गिक स्वरूपाच्या असणाऱ्या या भाज्यांची चवच न्यारी असते.
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास या रानभाज्यांची लागवडी करता येईल. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होईल पण त्यासाठी निसर्ग मंडळाकडून या रानभाज्यांची ओळख व त्यातील औषधी गुणधर्म यांचा नागरिकांना परिचय करून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे गरजेचे आहे.
त्याचबरोबर जुन्या जाणत्या जाणकाराबरोबर या रानभाज्यांची जंगलातून निवड करणे गरजेचे आहे. नेहमीच्या दिवसापेक्षा ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात आठवड्यातून सर्रास रानभाज्याची मेजवानी दिसून येते.
रानभाज्यांवर आर्थिक बचत
"निसर्गात मिळणाऱ्या रानभाज्यावर कित्येक शेतकरी बाजारातील रासायनिक भाजीपेक्षा या भाजीला महत्व देतात. त्यामुळे या नैसर्गिक भाजीवर अनेकजणांची आर्थिक बचत होते. त्यामुळे शेतकरी वर्ग अधिक काटक होऊन शेतात काम अधिक ताकतीने करत आहे"
- प्रकाश पाटील, माजी उपसरपंच, शेणवडे, ता. गगनबावडा