रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद कालवश
वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ कोलकाता
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले आहे. स्वामी स्मरणानंद यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वामी स्मरणानंद हे 2017 मध्ये रामकृष्ण मिशनचे 16 वे अध्यक्ष झाले होते. रामकृष्ण मिशनने त्यांच्या निधनाची पुष्टी दिली आहे.
तत्पूर्वी 29 जानेवारी रोजी प्रकृती बिघडली असता त्यांना रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानमध्ये भरती करण्यात आले होते. यानंतर त्यांना श्वसनावेळी त्रास होऊ लागला होता .यामुळे त्यांना 3 मार्च रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
स्वामी स्मरणानंद महाराज यांनी स्वत:चे जीवन अध्यात्मिकता आणि सेवेसाठी समर्पित केले होते. असंख्य मनांवर त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला होता. त्यांची करुणा आणि बुद्धिमत्ता भावी पिढ्यांना प्रेरित करत राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केले आहे.
स्वामी स्मरणानंद यांच्याशी माझा अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध राहिला आहे. 2020 मध्ये बेलूर मठाच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्याशी मी संवाद साधला होता. काही आठवड्यांपूर्वी कोलकात्यातील रुग्णालयात जात त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली होती. बेलूर मठाच्या असंख्य भाविकांसोबत माझ्या संवेदना असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. भाजप आमदार शुभेंदु अधिकारी यांनी रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनामुळे दु:ख झाल्याचे म्हटले आहे.
2017 मध्ये अध्यक्ष
स्वामी स्मरणानंद हे रामकृष्ण मठ आणि मिशनचे 16 वे अध्यक्ष होते. स्वामी आत्मस्थानंद यांच्या निधनातंर 17 जुलै 2017 रोजी त्यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. स्वामी स्मरणानंद यांचा जन्म 1929 मध्ये तामिळनाडूच्या तंजावुर येथील अंदामी गावात झाला होता. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांचा रामकृष्ण संप्रदायाशी पहिला संपर्क झाला होता. तर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी स्वत:ला मठासोबत जोडून घेतले होते.