राजस्थान मुख्यमंत्र्यांबाबत आज निर्णय
नवा नेता सर्वसाधारण प्रवर्गातील असण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री निवडीवरून सुरू असलेला गोंधळ आज म्हणजेच 12 डिसेंबरला थांबणार आहे. भाजपने मंगळवारी सर्व नवनिर्वाचित आमदारांना राजधानी जयपूरमध्ये आमंत्रित केले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निरीक्षक राजनाथ सिंह मंगळवारी सकाळी पोहोचणार आहेत. तसेच सरोज पांडे आणि विनोद तावडे सोमवारी रात्रीच जयपूरला पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मंगळवारी दुपारी भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 115 जागा मिळवत बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. मात्र, निवडणूक निकालाला आठवडा उलटूनही भाजपला मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. वास्तविक मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर पक्षातील अंतर्गत कलह वाढेल आणि त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, अशी भीती भाजपला वाटत आहे. अशा स्थितीत भाजपने तीन ज्येष्ठ नेत्यांना निरीक्षक म्हणून राजस्थानला पाठवले. भाजपने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, खासदार सरोज पांडे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राजस्थानसाठी निरीक्षक बनवले आहे.
भाजप नेतृत्वाने नियुक्त केलेल्या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत मंगळवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या बैठकीतच राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. खरे तर पक्षनेतृत्वाने निरीक्षकांना मुख्यमंत्रिपदावरून आमदारांशी बोलून अहवाल दिल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री निवडीवर शिक्कामोर्तब करेल.
वसुंधरा राजेंची ‘फिल्डिंग’
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी भाजपकडे अनोखी मागणी केल्याचे समजते. सिंधिया यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला एका वर्षासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याचा दावा सूत्रांनी केला. यानंतर आपण स्वत: हे पद सोडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. मात्र, यासोबतच पक्षनेतृत्वाने त्यांना सभापती करण्याची ऑफर दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र, सभापती करण्याचा पक्षाचा प्रस्ताव त्यांनी नाकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्याकडे मुख्यमंत्री बनवण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर वसुंधरा राजे यांनीही आमदारांना वेगळे न भेटण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी रात्री वसुंधरा राजे यांनी न•ा यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर न•ा यांनी त्यांना स्पीकर बनवण्याची ऑफरही दिली, जी वसुंधरा यांनी नाकारली.
राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे सिंधिया यांचा मान खूप मोठा आहे. त्या पक्षाच्या तगड्या नेत्या असून दोनवेळा राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. निवडणुकीच्या निकालात बंपर यश मिळाल्यानंतर त्यांनी आपली ताकद दाखवून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या घरी विजयी आमदारांची रांग लागली होती, तर त्यांनी स्वत: दिल्ली गाठून केंद्रीय नेतृत्वासोबत अनेक बैठका केल्या होत्या.