Ratnagiri News : राजापुरात रेल्वे प्रवाशांची लूट ?
राजापूर : तालुक्यातील राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथील काही रिक्षा व्यावसायिकांकडून पेट्रोल, सीएनजीचा तुटवडा व वाढलेल्या दरांचा फायदा घेत प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याने प्रवाशाांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राजापूर रोड रेल्वे स्टेशन ते राजापूर शहर हे अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे.
तरीसुद्धा काही रिक्षाचालकांकडून राजापूर शहराकडे येण्यासाठी तब्बल ७०० ते ८०० रुपये प्रवासभाडे घेत आहेत तर तालुक्यातील गावांमध्ये जाण्याकरिता आकारण्यात येणारे भाडे कितीतरी पटीने ज्यादा आकरले जात आहे तर दुसरीकडे काही रिक्षाचालकांकडून शहराकडे येण्याकरीता एका सीटमागे १०० रुपये आकारून चार ते सहा प्रवासी कोंबून प्रवास घेऊन जात असल्याचाही आरोप होत आहे.
रेल्वेस्टेशन परिसरात काही रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरू असून त्याचा फटका प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना बसत आहे. रेल्वे स्टेशनला काही खासगी वाहने व चारचाकी वाहनधारकही अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
कर्ज काढून रिक्षा खरेदी करून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या चालकांना अशा बेकायदेशीर व अवाजवी भाडे आकारणाऱ्या व्यवसायिकांमुळे आर्थिक फटका बसत आहे. अनेक रिक्षा सीएनजीवर चालत असूनही काही चालकांकडून ७०० ते ८०० रुपये आकारले जात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई ते राजापूर रोड पर्यंत रेल्वेचे १८० रूपये तिकीट आकरले जात आहे. मात्र, राजापूर रेल्वे स्टेशनहून शहर वा ग्रामीण भागात जाण्याकरिता काही रिक्षावाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकरले जात असल्याने चाकरमान्यांना चांगलाच फटका बसत असल्याची ओरड सुरू झाली आहे.