Raj Thackrey on SIR तुम्ही गुलाम आहात का? आता आम्ही यांच्याकडे भिका मागायच्या? मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडली
आज मुंबईत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी SIR मुद्द्यावर आपली भूमीका स्पष्ट केली. SIR मुळे पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काय झालं ते आपण पाहिलंच आहे असं म्हणून राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. अनेक राजकिय पक्षांनी मतदार याद्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपल्या चुकांमुळे आपण आपल्या आयुष्याची ५ वर्षे घालवतो आहोत याचे भान असायला हवं असं राज ठाकरे म्हणाले.
SIR सोबतच राज ठाकरेंनी मुंबईतल्या सोसायट्यांमधील मराठी - अमराठी वादावरही भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून दादरच्या कबुतरखान्याचा विषय असो की जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांची वादग्रस्त विधानं असोत या संघर्षाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना केंद्रस्थानी राहिलेली पाहायला मिळत आहे. त्याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी आपली बाजू मांडली.
मेळाव्यात बोलताना पुढे राज ठाकरे म्हणाले आपण आंदोलन करतो ते ठीक आहे पण गेल्या काही काळात जर आपण निवडणूक प्रक्रिया नीट समजून नाही घेतली तर आपण आंदोलनंच करत राहू. आपल्याला आंदोलनात अडकवून ठेवले जात असून आपण निवडणूक प्रक्रियेपासून लांब जात आहोत असंही राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा मुद्दा
काही दिवसांपूर्वी जैन समाजातील काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोपाच्या प्रतिकृतीवर जैन धर्माचे झेंडे लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आक्रमक शैलीत बोलताना सांगितलं आता तुम्हाला महाराजांचा जिरेटोपही कळेनासा झाला. निवडणूक प्रक्रियेपासून तुम्हाला दूर ठेवून फक्त आंदोलनापुरतं मर्यादित ठेवलं जातंय का? याचाही विचार करा असा संदेश यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
काही जैन मुनी भाजपच्या कच्छपी
जैन समाजातील चांगलं काम करणाऱ्या मुनींबद्दल आम्हाला आदरच आहे पण काही जैन मुनी भाजपच्या नादी लागून राजकारण करतायत आणि त्यात तुम्हाला अडकवून ठेवलं जातंय. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत या जैन मुनी निलेशचंद्रांच्या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले तुम्ही मराठी माणसाचं मनगट कधी बघितलंय का? रस्त्यावर चालताना, हायवेवर चालताना कधी मुनींना पांढरे पट्टे लागत नाहीत मग सोसाटीतच का लागतात, यातून तुम्ही अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करताय का? असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी विचारला.
देशाचा विचका झाला
देशात कोण सत्तेत आहे? कोण विरोधात आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही पण आज देशाचा विचका झाला आहे. बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. देशात विशेषत: महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना आपल्या आमदार, खासदार फोडले जात आहेत, लोकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा की, ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही कित्येक तास उन्हात उभे राहिलात ते जर 100 कोटींसाठी विकले जात असतील तर पुन्हा तुमच्याकडे ते आले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल याचा विचार तुम्ही करा असं राज ठाकरे म्हणाले.
आता आम्ही यांच्याकडे भिका मागायच्या का?
महाराष्ट्राला उर्जा मंत्रालयाने १०० पैकी दीड गुण दिलेत. अशावेळी इथे उद्योगपती गुंतवणूक करतील महाराष्ट्राची वीज ताब्यात घेतील, पाणी ताब्यात घेतील अशा लोकांकडे आम्ही भिका मागायच्या? तुम्ही गुलाम आहात का? अशा गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ते SIR द्वारे तुमची मत काढतील. ऐनवेळी तुमचं मत यादीत नसल्यावर तुम्ही काहीच करु शकणार नाहीत. असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.