उत्तर प्रदेशात पावसाचा तडाखा सुरूच
दिल्ली-मुरादाबाद महामार्गावर 2 फूट पाणी : मध्यप्रदेश, राजस्थानातही अतिवृष्टीचा इशारा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे घाघरा, कोसी, शारदा आणि सरयू नद्यांना पूर आला आहे. बहराइचमध्ये घाघरा आणि सरयू नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 20 गावांना पुराचा विळखा बसला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये कोसी नदीचे पाणी घुसल्याने मुरादाबाद-दिल्ली महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे 2 फूट पाणी तुंबल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाला होता.
उत्तर प्रदेशसोबतच नजिकच्या अन्य राज्यांमध्येही पावसाचे सत्र सुरू आहे. उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस आणि पुरासारखी परिस्थिती आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाच्या घटनांमुळे 478 रस्ते बंद आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या 22 जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. तसेच मध्यप्रदेशातील 10 आणि राजस्थानच्या 8 जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमधील 38 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे