रेल्वेने भरली थकबाकी दोन कोटी 89 लाख
कोल्हापूर :
महापालिकेच्या पुरवठा विभागाने शहरातील आणि ग्रामीण भागातील 785 थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित केले आहे. रेल्वे प्रशासनाकडील थकीत पाणी बिलापोटी तीन नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. यानंतर रेल्वे विभागाने महापालिकेची थकबाकी तत्काळ भरली. रेल्वेने शुक्रवारी महापालिकेच्या खात्यावर दोन कोटी 89 लाख 33 हजार रुपये जमा केले.
रेल्वे प्रशासनाकडे महापाकिलेच्या पाणी पुरवठा विभागाचे तीन नळ कनेक्शन आहेत. याचे सरासरी साडे तीन कोटी रुपयांचे बिल थकीत होते. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अनेक वेळा संपर्क करुनही रेल्वे प्रशासन दाद देत नव्हते. अखेर महापालिकेने शुक्रवारी सकाळी रेल्वेचा पाणी पुरवठा खंडित केला. रेल्वे स्टेशनमधील पाण्याचे कनेक्शन बंद झाल्याने प्रशासन हडबडून जागे झाले. पुण्यापर्यंत यंत्रणा हलली. महापालिकेने केलेल्या कारवाईची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तत्काळ दोन कोटी 89 लाख 33 हजार रुपये महापालिकेकडे जमा केले. यानंतर पाणी पुरवठा विभागाने रेल्वेचा खंडित केलेला पाणी पुरवठा पुर्वव्रत केला.
महापालिकेने थकीत रक्कम एक रक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के सवलत योजना 31 मार्चअखेर जाहीर केली आहे. या सवलत योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 25 हजार 456 थकबाकीदारांनी 13 कोटी 61 लाख 62 हजार रुपये महापालिकेकडे जमा केले आहेत. 31 मार्चपर्यंत असण्राया या सवलत योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन महापालिका प्रशसनाने केले आहे. या सवलत योजनांतर्गत 31 मार्च 2025 अखेर जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
थकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर यापुढेही महापालिकेची मोहीम सुरु राहणार आहे. शहरातील नागरिकांनी अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन घ्यावीत, पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावी. अन्यथा नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखी कारवाई करण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने पत्रकाद्वारे जाहीर केले.