विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर बिनविरोध
अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांचा एकट्याचाच अर्ज दाखल : रविवारी 106 जणांनी घेतली शपथ, विरोधकांचाही सहभाग
प्रतिनिधी, मुंबई :
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा 8 डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. मात्र एकच अर्ज दाखल झाल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास स्पष्ट आहे.
288 सदस्यांच्या सभागफहात महायुतीकडे मोठे संख्याबळ असल्याने या पदावर नार्वेकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
दुसऱ्या दिवशी 106 आमदारांनी घेतली शपथ
रविवारी एकूण 106 आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली असून, अनुपस्थित राहिलेल्या आठ आमदारांचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यांना सदस्यत्वाची शपथ आज दिली जाणार आहे किंवा हिवाळी अधिवेशनापूर्वी त्यांना अध्यक्षांच्या दालनात सदस्यत्वाची शपथ घ्यावी लागणार असल्याची माहिती आहे. दरम्यान पहिल्या दिवशी विरोधकांनी शपथ घेण्यास विरोध केला होता, मात्र दुसऱ्या दिवशी रविवारी विरोधकांचा शपथविधी सोहळ्याला सहभाग राहिल्याचे दिसून आले.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी आज 9 डिसेंबररोजीचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. सोमवारी विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाईल. त्याला अनुमोदन दिल्यानंतर आवाजी मतदान पार पडेल. यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार असल्याची माहिती आहे.
राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावऊन झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. त्यावेळी सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. मात्र कमी वयाचे असतानाही पेशाने वकील असल्याने नियम आणि कायद्याचा अभ्यास करून त्यांनी परिस्थितीचा सामना केला होता. त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाने दबावही आणला. पण ते दबावापुढे झुकले नाहीत.
शिवसेनेचे वकील ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते
राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसेच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचे काम राहुल नार्वेकर करत असत. पुढे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते, याची आठवण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीकरून दिली.
लोकसभा निवडणुकीत पराभूत
राहुल नार्वेकर यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा पत्करावा लागला होता. पण 2014 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवले.
भाजपामध्ये प्रवेश
राहुल नार्वेकर यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी भाजपतर्पे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवाय भाजपकडून त्यांना माध्यम प्रभारी म्हणून जबाबदारीही देण्यात आली होती.
2024 च्या निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभेवर
राहुल नार्वेकर यांना यावेळी मंत्रीपदाची अपेक्षा होती. परंतु महायुतीचे आमदार बहुसंख्येने निवडून आले असले तरी पुढचा मार्ग सहजसोपा नाही याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षांत राहुल नार्वेकर यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. त्यामुळे पुन्हा राहुल नार्वेकर यांनाच अध्यक्षपदासाठीच महायुतीतर्पे पसंती देण्यात आली आहे.