राहुल गांधी जयपूरमधून ‘मिशन राजस्थान’ सुरू करणार
राजस्थानात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुढाकाराने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी ‘मिशन राजस्थान’ ची सुरवात करण्यात येणार आहे. 16 नोव्हेंबरपासून हे अभियान हाती घेण्यात येणार आहे. राहुल गांधी हे राजस्थानातील प्रचारापासून दूर आहेत, ही टीका केली जात असतानाच त्यांनी या अभियानाची घोषणा केली आहे. दिवाळीनंतर या मिशनला जोर येणार आहे.
राजस्थानात 25 नोव्हेंबरला सर्व 200 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्याच्याआधी हे अभियान हाती घेतले जाणार असून ते आठ दिवस चालविण्याची योजना आहे. त्याची सुरवात राजधानी जयपूरपासून केली जाणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये राजस्थानात राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साधारणत: 20 जाहीर सभा घेणार आहेत. तसेच अनेक रोड शोही करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
मतभेद मात्र कायम
राहुल गांधी यांनी प्रचारात पुढाकार घेतला असला तरी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यातील मतभेद आणि मनभेद कायम असल्याचे दिसत आहे. जयपूरमध्ये गेहलोत यांच्या दोन मोठ्या कार्यक्रमांपासून पायलट हे अलिप्त राहिले होते. त्यावरुन पक्षात सर्वकाही ठीक नाही, असा संदेश जात आहे, असे मत सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.