‘शक्ती’ वरुन राहुल गांधी वादात
पंतप्रधान मोदी यांच्याकडून खरपूस समाचार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन खळबळ माजविली आहे. ‘शक्ती’शी आपल्याला संघर्ष करायचा आहे, असे विधान त्यांनी केले. याच विधानाला जोडून त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविषयीही शंका व्यक्त करणारी विधाने केल्याने वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला असून सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे. विधानामुळे राजकीय हानी होऊ शकते, हे जाणून घुमजाव करत विधानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला, अशी सारवासारवी त्यांनी केली आहे.
हिंदू धर्मात आणि संस्कृतीत ‘शक्ती’ ही संज्ञा देवतांना उद्देशून उपयोगात आणली जाते. राहुल गांधी यांनी या शब्दाचा उपयोग राजकीय दृष्टीने केल्याने मोठा वाद निर्माण झाला. आपण हिंदू शक्तीशी संघर्ष करीत आहोत. या शक्तीच्या राजाचा प्राण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात आहे, असे विधान गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले. नंतर त्यांना सारवासारवी करावी लागली.
भाजपचा त्वरित प्रतिहल्ला
राहुल गांधी यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्ष त्वरित अक्षरश: तुटून पडला आहे. हिंदू धर्माची अवमानना करण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘शक्ती’ या शब्दाचा उपयोग केला आहे. हिंदू धर्मात महिलांचा उल्लेख, तसेच देवतांचा उल्लेख शक्ती असा आदराने केला जातो. या शक्तीविरोधात गांधी संघर्ष करीत आहेत. आम्ही मात्र, या शक्तीसमोर नेहमी नतमस्तक असतो. आम्ही शक्तीचा आदर करतो. शक्तीस्वरुप असणाऱ्या माता आणि भगिनींचा आम्ही सन्मान करतो. गांधी यांनी या शब्दाचा अवमानजनक पद्धतीने उपयोग करुन त्यांची मानसिकता प्रदर्शित केली आहे, असे टीकाप्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहेत.
गांधी हिंदूविरोधी
शक्तीसंबंधी अश्लाघ्य बोलून राहुल गांधी यांनी ते हिंदूविरोधी आहेत, हे उघडपणे दाखवून दिले आहे. संधी मिळेल तेव्हा ते हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा अपमान करण्यात धन्यता मानतात. शक्ती ही संज्ञा हिंदू जनता दुर्गा, अंबा, कालीमाता अशा देवतांच्या संदर्भात उपयोगात आणते. राहुल गांधींमध्ये या शक्तींशी संघर्ष करण्याची क्षमता आहे काय ? त्यांच्यात तेवढे सामर्थ्य आहे काय ? असे प्रतिप्रश्न भारतीय जनता पक्षाने विचारले आहेत.
हेच त्यांचे ध्येय...
हिंदू धर्मात ज्या शक्तीचा आदराने उल्लेख केला जातो, ती शक्ती संपविणे हेच राहुल गांधी यांचे ध्येय आहे. पण आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. हे विधान करुन त्यांनी संपूर्ण नारीशक्तीचाच उपमर्द केला आहे. पण आम्ही नारीशक्तीच्या प्रतिष्ठेसाठी आमचे प्राणही अर्पण करण्यास सज्ज आहोत. गांधींचे ध्येय कधीच सफल होणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
गांधी यांचे घुमजाव, सारवासारवी
शक्ती हा शब्द अशा प्रकारे आपल्यावरच उलटणार आहे, याची जाणीव झाल्यानंतर गांधी यांनी घुमजाव केले. माझा शब्द संदर्भ सोडून उपयोगात आणण्यात येत आहे. शक्ती हा शब्द मी कोणत्याही धर्माला उद्देशून उपयोगात आणला नव्हता, अशी सारवासारवी नंतर त्यांनी केली. तथापि, तोपर्यंत कोट्यावधी लोकांपर्यंत त्यांचे वादग्रस्त विधान पोहचल्याने काँग्रेसचीही कोंडी झाली आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुरोहित आचार्य सत्येंद्र दास यांनीही राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. देवदेवतांच्या विरोधात अश्लाघ्य भाषा करुन जे लोक त्यांचा अपमान करतात, त्यांना कारागृहात डांबले पाहिजे. अशा विधानांमुळेच आज विरोधी पक्षांची स्थिती दयनीय झाली आहे. भारत देश घराणेशाहीच्या सामर्थ्यावर नव्हे, तर देवतत्वाच्या सामर्ध्यावर चालतो. कोणीही सनातन धर्म, शक्ती आणि हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचे दु:साहस करु नये. अन्यथा त्यांची अपरिमित हानी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आचार्य सत्येंद्र दास यांनी एका वक्तव्याद्वारे प्रसिद्ध केले आहे.
परंपरा राखली
ड मागील निवडणुकांमध्येही राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे बसला फटका
ड शक्तीसंबंधी विधानामुळे देशभरात गदारोळ, काँग्रेसकडून मात्र समर्थन
ड विधानावर टीकेची झोड उठल्याने गांधी यांच्याकडून नंतर सारवासारवी